जयंती: संत्या ते संतोष चा मार्ग
"जयंती" हा अनलॉक नंतर सिनेमागृहात आलेला पहिलाच मराठी चित्रपट. चित्रपटाविषयी फारच उत्सुकता होती. जेवढी उत्सुकता होती त्यापेक्षा खूप जास्त या चित्रपटाने विचार दिला. हा चित्रपट बघतांना सुमार चित्रपट आहे असे अजिबात वाटले नाही. अतिशय दर्जेदार चित्रपट. सर्वांगाने दर्जेदार. या पूर्वी फँड्री, सैराट हे चित्रपट आलेत मात्र ते वेगळ्या धर्तीवर आधारित होते. हा चित्रपट कोणत्याही एक महामानवर आधारित नाही तर समस्त महापुरुषांवर आहे. सर्व महापुरुषांची जयंती अगदी थाटामाटात साजरी केली जाते. मात्र त्यांचे विचार काय, कार्य काय हे जाणून न घेता. जयंती भावनिक होऊन, डोक्यावर घेऊन साजरी करण्यापेक्षा डोक्यात घेऊन साजरी करावी असा मोलाचा संदेश या चित्रपटातून दिला आहे. त्यांचे विचार आचरणात आणून त्यांची जयंती साजरी करावी. कित्येक लोक दारू पिऊन डीजे वाजवून जयंती साजरी करतात. अनेक ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमात डीजे नाही म्हणू...
