राज्यातील लाखो शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या लाभार्थी यादीची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची माहिती दिली आहे.
भरणे यांनी सांगितले की, कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून सध्या केवायसी (KYC) पडताळणी आणि आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती तपासण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पुढील दोन-तीन दिवसांत पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर केली जाईल.
कर्जमाफी योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी शासनाकडून प्रक्रिया काळजीपूर्वक राबवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीयीकृत बँकांशी संबंधित काही तांत्रिक बाबी सोडवण्याचे कामही सुरू असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून न जाता संयम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळावे, अशी सरकारची भूमिका असल्याचे सांगितले. तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामाबाबत बोलताना भरणे यांनी राज्यात सुमारे 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती दिली. विदर्भातही बहुतांश भागात पेरण्या पूर्ण झाल्या असून पुढील काळात पुरेशा पावसाची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.







