आधुनिक भारताचे शिल्पकार
भारतातील वर्ग आणि जातीअंताच्या लढय़ाला आकार व दिशा देण्याचे भरीव काम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषणमुक्ती आणि समतेसाठीच्या लढय़ांमध्येही डॉ. बाबासाहेब प्रेरणादायी ठरले आहेत. जगाच्या इतिहासात असे योगदान देणार्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये त्यांचे स्थान अग्रणी आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात. सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषत: वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकारासाठी त्यांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता. लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप. डॉ. बाबासाहेबांना बालपणापासून अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. इ.स.१९३५-३६ या कालावधीदरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत त्यांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटू अनु...