मोर्शी | प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात बूस्टर कंपनीच्या ‘हुतूतू’ या सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याचा आरोप करत शेकडो शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संबंधित कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
मोर्शी तालुक्यातील लाडकी, कशीमपूर, खोपडा, तरोडा आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने बूस्टर कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र पेरणीनंतर दहा दिवसांहून अधिक काळ उलटल्यानंतरही अनेक शेतांमध्ये बियाण्याची उगवण झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
आधीच वाढलेला उत्पादन खर्च, महागडी बियाणे, खतांचे वाढलेले दर आणि पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकरी अडचणीत असताना निकृष्ट दर्जाच्या बियाण्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आंदोलनानंतर तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने यांना निवेदन देण्यात आले. तसेच लाडकी, कशीमपूर आणि खोपडा परिसरातील शेतांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर जिल्हा सरचिटणीस हितेश साबळे यांनी संबंधित बियाण्याची स्वतंत्र प्रयोगशाळेत तपासणी करून कंपनी, वितरक आणि विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे द्यावे, अशी मागणी केली.
आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
टीप : बियाणे निकृष्ट असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून, संबंधित कंपनीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.







