गणेशराव देशकरी यवतमाळ जिल्हा | प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा आणि दिग्रस परिसरात शेतकऱ्यांना सतावणाऱ्या शेतचोरांच्या टोळीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून ₹2 लाख 56 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दारव्हा आणि दिग्रस परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतांमधील इलेक्ट्रिक मोटार पंप, तांब्याची वायर तसेच गोदामांतील सोयाबीन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे इस्लामपूर येथे सापळा रचून मुख्य आरोपी मोहम्मद मुस्तकीर उर्फ मोहम्मद मुस्ताक याला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने साथीदारांसह अनेक चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून दोन इलेक्ट्रिक मोटार पंप, सुमारे 15 किलो तांब्याची वायर, सुमारे 44 क्विंटल सोयाबीन आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली विना क्रमांकाची व्हॅगनआर कार जप्त केली. या सर्व मुद्देमालाची किंमत ₹2.56 लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासात आरोपी दिवसा शेत व गोदामांची रेकी करून रात्रीच्या अंधारात चोरी करत असल्याचे समोर आले. या कारवाईमुळे दारव्हा आणि दिग्रस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. शेतकरी बांधवांनी शेतशिवार किंवा गोदाम परिसरात संशयास्पद व्यक्ती अथवा वाहन दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एलसीबीच्या या कारवाईमुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून फरार आरोपींना लवकर अटक करण्याची मागणीही जोर धरत आहे.








