जळगाव प्रतिनिधी :
अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला अधिक गती देत जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 930.82 किलो गांजा, ज्याची अंदाजे किंमत 1 कोटी 86 लाख 16 हजार 400 रुपये आहे, तो सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला.
ही कारवाई जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या आठ गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमालावर करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार तसेच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत गांजा नष्ट करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केंद्रीय मुद्देमाल कक्षातून जप्त अंमली पदार्थ ताब्यात घेतले. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या परिसरामागील मोकळ्या जागेत सुरक्षित पद्धतीने खड्डा खोदून पर्यावरणाला कमीत कमी हानी होईल अशा पद्धतीने संपूर्ण गांजा नष्ट करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.
या वेळी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीचे सदस्य, पोलीस अधिकारी आणि कृषी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात अमली पदार्थांचा गैरव्यवहार रोखण्यासाठी पोलिसांकडून भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, ड्रग्स माफियांना हा मोठा इशारा असल्याची चर्चा आहे.








