स्वत:च्या डोक्याचा वापर करा…!
शेती करणारा शेतकरी आज अडचणीत असला, तरी।शेतीसाठीचे पुरवठादार आणि सल्लागार लखोपती, करोडपती आहेत. खत, बी-बियाणे, कीटकनाशके पुरवणारे कृषि सेवा केंद्रवाले असोत की, शेतीत उत्पादन कसं वाढवायचं, कोणती पिकं घ्यायची, याचं मार्गदर्शन करणारे सल्लागार असोत, त्यांचंही छान चाललयं. यांनाही शेतीतील जोखमीचा फटका बसत नाही. फटका बसतो तो फक्त शेतकऱ्यांना. हा जमाना प्रसिद्धीचा, खऱ्या खोट्या प्रचाराचा, मार्केटिंगचा आहे. त्यात भलं-बुरं दोन्ही खपवलं जातं. हे मार्केटिंग शेतकऱ्यांना चक्रावून सोडणारं असतं.
कोणी म्हणतं, आंबा लावा, डाळिंब लावा; कोणी द्राक्ष, कोणी शेवगा लावा म्हणतं; तर कोणी बांबू लावा, चंदन लावा म्हणतं. कोणी भाजीपाला लावायला सांगतं, तर कोणी फुलशेती करा म्हणतं. एक नाही, शेकडो सल्ले. डोळे फिरवणाऱ्या अनेक यशकथा. कोणी कोथिंबीर विकून कसा लखोपती झाला हे सांगतं, तर एक एकर आंब्यात २५ लाखाचं उत्पन्न झाल्याचं...