मुंबई प्रतिनिधी :
अमरावती विभागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. अमरावतीच्या बांबू गार्डन येथे अत्याधुनिक प्रादेशिक वन्यजीव बचाव, उपचार व पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत केली.
ही घोषणा आमदार संजय खोडके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना करण्यात आली.
संजय खोडके यांनी विधानपरिषदेत सांगितले की, अमरावती विभागातील जंगल परिसरात अपघात, मानव-वन्यजीव संघर्ष, वन्यजीव तस्करी, विद्युत धक्का, रस्ते व रेल्वे अपघात, विहिरीत पडलेले वन्यप्राणी तसेच अनाथ पिल्ले अशा अनेक घटनांमध्ये जखमी झालेल्या वन्यजीवांवर तातडीने उपचार करण्यासाठी विभागात कोणतीही आधुनिक सुविधा उपलब्ध नाही.
सध्या अशा वन्यजीवांना उपचारासाठी नागपूर येथे हलवावे लागते. त्यामुळे उपचारात विलंब होऊन अनेक वन्यजीवांचा जीव धोक्यात येतो.
अमरावती हे अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांशी उत्तम रस्ते संपर्काने जोडलेले असल्याने संपूर्ण अमरावती महसूल विभागासाठी येथे प्रादेशिक वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्र उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह काटेपूर्णा, कारंजा-सोहोळ, ज्ञानगंगा, पैनगंगा, लोणार, इसापूर, टिपेश्वर अभयारण्य तसेच पोहरा-मालखेड वनक्षेत्रात वाढत्या वन्यजीव बचाव प्रकरणांचा उल्लेख करत त्यांनी शासनाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, अमरावतीच्या बांबू गार्डन येथे समर्पित वन्यजीव बचाव, उपचार व पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाला आहे. शासन या प्रस्तावाबाबत सकारात्मक असून लवकरच या केंद्राला प्रशासकीय मान्यता व आवश्यक निधी देऊन उभारणीची प्रक्रिया सुरू केली जाईल.
या निर्णयामुळे अमरावतीसह विदर्भातील पाच जिल्ह्यांतील जखमी वन्यजीवांना तातडीने उपचार, सुरक्षित पुनर्वसन आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असल्याने वन्यजीव संरक्षणाला मोठे बळ मिळणार आहे.






