गणेशराव देशकरी
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
समाजसेवा ही केवळ शब्दांत नसून कृतीतून दिसून येते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. गरजू रुग्णाला वेळेत मदत मिळावी यासाठी काही समाजाभिमुख व्यक्तींनी दाखविलेली तत्परता आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील तेलगव्हाण येथील किसन रूपला राठोड यांना व्हीलचेअरची अत्यंत गरज असल्याची माहिती रुग्णसेवक ओम हरमन दिवे पाटील यांना त्यांचे मित्र पंकज जयराज राठोड यांनी दिली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत ओम दिवे पाटील यांनी कोणताही विलंब न करता सामाजिक कार्यासाठी ओळख असलेले बच्चूभाऊ कडू यांच्याशी संपर्क साधला.
ही माहिती मिळताच बच्चूभाऊ कडूंनी संवेदनशीलता दाखवत तात्काळ व्हीलचेअर मंजूर केली. एवढ्यावरच न थांबता ती गरजूंना वेळेत पोहोचावी यासाठी स्वतःची गाडीही उपलब्ध करून दिली. त्यांच्या या कृतीमुळे रुग्णाला आवश्यक असलेली मदत योग्य वेळी मिळाली आणि कुटुंबालाही मोठा दिलासा मिळाला.
या संपूर्ण प्रक्रियेत पंकज जयराज राठोड यांनी सातत्याने पाठपुरावा केला. गरजूंपर्यंत मदत पोहोचावी, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे ठरले. समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्याची त्यांची तळमळ स्थानिक पातळीवर कौतुकास पात्र ठरत आहे.
यावेळी रुग्णसेवक ओम हरमन दिवे पाटील यांनी बच्चूभाऊ कडू यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. “समाजातील दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि वंचित नागरिकांना वेळेत मदत मिळावी, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, तसेच वैद्यकीय व आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी मी सातत्याने कार्य करत आहे. अशा कार्यातून समाजाचा आशीर्वाद मिळत राहणे हीच माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच बच्चूभाऊ कडू यांच्यासारख्या समाजाभिमुख व्यक्तींमुळे अनेक गरजू नागरिकांना नवजीवन मिळत असून, त्यांच्या माध्यमातून भविष्यातही अशीच समाजसेवा करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षाही ओम दिवे पाटील यांनी व्यक्त केली.
समाजात अजूनही संवेदनशील माणसे आहेत, जी गरज पडल्यास कोणतीही अपेक्षा न ठेवता मदतीचा हात पुढे करतात. अशा सेवाभावी कार्यामुळे समाजात माणुसकीची भावना अधिक दृढ होत असून, इतरांसाठीही हा एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.
‘खाशाबा’चा नायक कोण? नागराज मंजुळेंचा नवा चेहरा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला








