
अमरावतीत १७ मे रोजी चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन; गझल मुशायरा, परिसंवाद आणि कवीसंमेलनाची मेजवानी
अमरावती : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे स्मृतिदिन, क्रांतिवीर सुखदेवराव तिडके स्मृतिदिन आणि सूर्यभानजी मेश्राम यांच्या स्मृतिदिनानिमित्त शब्दास्त्र विचार मंच व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १७ मे २०२६ रोजी चौथ्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन येथे सकाळी १०.३० वाजता सुरू होणार असून साहित्य, समाजप्रबोधन आणि परिवर्तनवादी विचारांचा संगम अनुभवायला मिळणार आहे.
संमेलनाध्यक्ष म्हणून आंबेडकरी अभ्यासक प्रा. डॉ. अनंता सूर उपस्थित राहणार असून उद्घाटक म्हणून आंबेडकरी साहित्यिका सुषमा पाखरे भूमिका मांडतील. स्वागताध्यक्षपद माजी प्राचार्य डॉ. गोपीचंद मेश्राम भूषवणार आहेत. यावेळी प्रा. मुकुंद भारसाकळे, प्रा. डॉ. वसंत शेंडे,प्रा. डॉ. भास्कर पाटील, प्रा. डॉ. रविकांत महिंदकर, प्रा. अरुण बुंदेले आणि डॉ. विलास काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
संमेलनात विविध सत्रांद्वारे साहित्यिक आणि सामाजिक विषयांवर विचारमंथन होणार आहे. उद्घाटन सत्रानंतर ज्येष्ठ गझलकार सुदाम सोनुले यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले असून विनय मिरासे, दीपाली सुशांत, अतुलकुमार ढोणे, सुनीता मेश्राम, संघमित्रा खंडारे, प्रवीण कांबळे, गिरीश खोब्रागडे, अविनाश गोंडाणे आणि अब्दुल समद रजा यांसारखे गझलकार सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय निवेदक पवन डोंगरे कार्यक्रमाचे संचालन करणार आहेत.
तिसऱ्या सत्रात “भारतीय लोकशाही आणि वर्तमान स्थिती” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. कुंदाताई सोनुले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चासत्रात प्रा. सीमाताई मेश्राम, प्रा. डॉ. रजनी गेडाम, प्रा. दीपाली पडोळे आणि प्रतिभा प्रधान सहभागी होऊन समकालीन सामाजिक-राजकीय परिस्थितीवर आपली मते मांडणार आहेत.
संमेलनाच्या चौथ्या सत्रात परिवर्तनवादी आंबेडकरी कवीसंमेलन रंगणार आहे. प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कवीसंमेलनात शीला भास्कर पाटील, शिवा प्रधान, सुजाता पुरी, प्रा. देवानंद पाटील, विशाल मोहोड, हर्षवर्धन तायडे, सारिका वणवे, पूर्वा निजामशाही, मयुर गायकवाड यांच्यासह अनेक कवी सहभागी होणार आहेत.
समारोप सत्र डॉ. गोपीचंद मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून प्रा. डॉ. वसंत शेंडे, प्रा. अरुण बुंदेले, टी. एफ. दहीवाडे आणि दिलीप घरडे उपस्थित राहतील. साहित्य, सामाजिक जाणीव आणि परिवर्तनवादी विचारांची सांगड घालणाऱ्या या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.