गौरव प्रकाशन तिवसा | प्रतिनिधी
तिवसा तालुक्यात बोगस बियाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप समोर आला आहे. पेरणी करूनही बियाण्यांची अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी केली आहे.
तालुक्यात विविध कंपन्यांच्या बियाण्यांबाबत तक्रारी वाढल्यानंतर तब्बल 134 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी सेवा केंद्र संचालक आणि तक्रारदार शेतकऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत सागर भवते यांनी बोगस बियाणे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची भरपाई मिळवून देण्याची मागणी केली. तसेच बियाणे परीक्षणात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली.
यावेळी तहसीलदार मयूर कळसे, तालुका कृषी अधिकारी हेमलता इंगळे, नायब तहसीलदार नरेंद्र कुरळकर तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक प्रस्ताव तत्काळ पाठवण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आता परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
‘खाशाबा’चा नायक कोण? नागराज मंजुळेंचा नवा चेहरा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला







