पुणे : राज्यभर चर्चेत असलेल्या सिया-केतन हत्याकांडात आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर त्याच्या आईने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावनिक पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. या पत्रामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
पत्रामध्ये केतनच्या आईने आपल्या मुलाबद्दलच्या भावना व्यक्त करताना प्रत्येक आईप्रमाणे आपणही मुलाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहिली होती, असे नमूद केले आहे. मुलाचे लग्न होईल, तो कुटुंबासोबत आनंदाने संसार करेल आणि वृद्धापकाळी आधार बनेल, अशी अपेक्षा होती. मात्र नियतीने सर्व काही हिरावून घेतल्याचे त्यांनी वेदनादायी शब्दांत मांडले आहे.
त्यांनी पत्रात लिहिले आहे की, मुलाच्या हत्येनंतर घरातील प्रत्येक वस्तू त्याची आठवण करून देते. त्याची खोली, कपडे आणि फोटो पाहताना आजही तो आपल्या सोबत असल्याची भावना होते. मात्र त्या प्रत्येक क्षणी न्यायासाठी लढण्याची नवी ताकद मिळते. “एक दिवस मी माझ्या मुलाला सांगू शकेन की, मी तुला न्याय मिळवून दिला,” अशी भावनिक भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
हे प्रकरण अत्यंत धक्कादायक ठरले आहे. तपासानुसार, केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा साखरपुडा झाला होता आणि काही दिवसांत त्यांचे लग्न होणार होते. मात्र, सिया गोयलचे प्रेम चेतन चौधरी याच्यावर असल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतनची हत्या करण्यात आल्याचा आरोप सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर आहे.
दरम्यान, केतनच्या आईने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रानंतर या प्रकरणाकडे पुन्हा एकदा देशाचे लक्ष वेधले गेले आहे. न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून सातत्याने करण्यात येत आहे. तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘खाशाबा’चा नायक कोण? नागराज मंजुळेंचा नवा चेहरा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला









