पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी आणि भाविक सहभागी झाले असताना चोरट्यांनी गर्दीचा गैरफायदा घेत अनेकांच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या चोरींमध्ये एकूण साडेपाच लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.
भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील १ लाख १० हजार रुपयांचे मंगळसूत्र गर्दीतून चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी येथे आणखी एका महिलेच्या गळ्यातील ९० हजार रुपयांचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरीला गेली. या प्रकरणाचा तपास मांजरी पोलीस करत आहेत.
दरम्यान, हडपसर गाडीतळ चौकात पालखी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असताना एका महिलेसह १० भाविकांचे तब्बल ३ लाख ५६ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.
या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पुणे पोलिसांनी विशेष मोहीम राबवत ६७ महिलांसह एकूण ८९ संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची सखोल चौकशी सुरू असून चोरीच्या आणखी घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांनी गर्दीच्या ठिकाणी दागिने आणि मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.







