मुंबई | प्रतिनिधी
मुंबईची लोकल ही लाखो प्रवाशांसाठी रोजच्या प्रवासाचा आधार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लोकलमधील विविध घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच एका तक्रारीमुळे पुन्हा एकदा मुंबई लोकल चर्चेत आली आहे.
मुंबईतील सचिन कुमार मौर्य यांनी रेल्वेच्या तिकीट तपासनीसावर (टीसी) गंभीर आरोप करत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २५ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मस्जिद बंदर स्थानकाजवळ एका विनातिकीट प्रवाशाला टीसीने धावत्या लोकलमधून लाथ मारून खाली ढकलले.
तक्रारीनुसार, संबंधित प्रवाशाकडे दंड भरण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यानंतर टीसीने त्याला मारहाण करून ट्रेनमधून बाहेर ढकलल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे तो प्रवासी रेल्वे रुळांवर पडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची माहिती रेल्वे हेल्पलाइन 1512 वरही देण्यात आल्याचे तक्रारदाराने सांगितले.
रेल्वे प्रशासनाचं स्पष्टीकरण
या आरोपांनंतर रेल्वे प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाची प्राथमिक तपासणी केली. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, संबंधित टीसीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
रेल्वेच्या माहितीनुसार, संशयित विनातिकीट प्रवाशाने टीसी दिसताच स्वतःच डब्याच्या विरुद्ध बाजूने उडी मारली. त्यानंतर टीसीही लगेच खाली उतरल्याचे सांगण्यात आले.
भायखळा रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर, त्यामध्ये टीसीने प्रवाशाला लाथ मारल्याचा किंवा धक्का दिल्याचा कोणताही स्पष्ट पुरावा आढळला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
फुटेजनुसार, टीसी अवघ्या चार ते पाच सेकंदांत डब्यात चढून पुन्हा खाली उतरल्याचे दिसते. इतक्या कमी वेळात प्रवाशाला लाथ मारून बाहेर ढकलणे शक्य नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
तपासाकडे सर्वांचे लक्ष
या घटनेबाबत तक्रार आणि रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण समोर आल्यानंतर नेमके सत्य काय, याकडे प्रवासी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. पुढील तपासानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.








