काही बातम्या आपण वाचतो आणि पुढच्या क्षणी विसरून जातो. मात्र काही घटना मनात खोलवर उमटतात. पत्रकार कुंदन जाधव यांच्या अपघाती निधनाची बातमी ही अशीच मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याचे दुःख आहेच; पण या घटनेने आपल्या सगळ्यांसमोर एक महत्त्वाचा प्रश्नही उभा केला आहे आपल्या जवळच्या माणसांची आपण खरंच किती काळजी घेतो?
पत्रकाराचे आयुष्य म्हणजे सततची धावपळ. एखादी घटना घडली की घटनास्थळी पोहोचणे, माहिती गोळा करणे, संबंधितांशी बोलणे, सत्य समजून घेणे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणे, हे त्याच्या कामाचा भाग असते.
दिवसभर इतरांच्या समस्या ऐकणारा पत्रकार मात्र स्वतःच्या आयुष्यात काय अनुभवत आहे, हे अनेकदा कुणाच्या लक्षात येत नाही.ही गोष्ट केवळ पत्रकारांपुरती मर्यादित नाही आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे बाहेरून अगदी व्यवस्थित दिसतात. कुणी नोकरीच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त आहे, कुणी व्यवसायाच्या धावपळीत आहे, तर कुणी कुटुंबासाठी सतत झटत आहे. चेहऱ्यावर हसू असले तरी मनात काय सुरू आहे, हे आपल्याला माहीत नसते.
म्हणूनच कधी कधी मोठ्या मदतीपेक्षा एक छोटासा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो “तू ठीक आहेस ना?”या चार शब्दांमागे काळजी असते. आपुलकी असते. समोरचा माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ही भावना असते. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. सोशल मीडियावर आपण अनेकांशी जोडलेले आहोत. रोज असंख्य संदेश येतात. मात्र प्रत्यक्ष मनापासून संवाद साधण्यासाठी वेळ कमी होत चालला आहे.
एखादा मित्र काही दिवस संपर्कात नसेल तर आपण सहज म्हणतो, “तो व्यस्त असेल.” एखादा सहकारी शांत असेल तर, “काही नाही, त्याचा स्वभावच तसा आहे,” असे म्हणून आपण पुढे जातो. पण कदाचित त्या व्यक्तीला त्या क्षणी फक्त कुणीतरी ऐकून घेण्याची गरज असू शकते. म्हणून आपल्या जवळच्या व्यक्तींशी अधूनमधून कारण नसतानाही बोलणे गरजेचे आहे. त्यांच्या कामाबद्दलच नव्हे, तर “तू कसा आहेस?” याबद्दलही विचारले पाहिजे.
पत्रकारिता हे जबाबदारीचे आणि अनेकदा तणावाचे क्षेत्र आहे. बातमीच्या स्पर्धा, वेळेची मर्यादा, सततचे अपडेट्स आणि घटनास्थळी धावपळ यामुळे पत्रकारांवर मोठा ताण असतो. या वातावरणात सहकाऱ्यांमधील संवाद आणि परस्परांची काळजी अधिक महत्त्वाची ठरते.
मतभेद असू शकतात. वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम असू शकते. बातमी मिळवण्याची स्पर्धाही असू शकते. पण या सगळ्यापेक्षा माणूस मोठा आहे, ही जाणीव कायम राहिली पाहिजे. ज्येष्ठ पत्रकाराने तरुण सहकाऱ्याची विचारपूस करावी आणि तरुणानेही ज्येष्ठ सहकाऱ्याच्या अडचणी समजून घ्याव्यात. एकमेकांना केवळ व्यावसायिक सहकारी म्हणून नव्हे, तर सहप्रवासी म्हणून पाहिले तर वातावरण अधिक संवेदनशील होऊ शकते.
कुंदन जाधव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि परिचितांवर मोठे दुःख कोसळले आहे. त्यांच्या सहकाऱ्यांसाठीही ही घटना धक्कादायक आहे. त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहताना केवळ शोक व्यक्त करून थांबण्याऐवजी त्यांच्या जाण्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाकडेही पाहण्याची गरज आहे.
कुणी आपल्याला फोन केला नाही म्हणून आपणही फोन करत नाही का? कुणी शांत दिसले तर त्याच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्यालाच काही त्रास होत असेल तर तो कोणाशी बोलतो का?
कदाचित आपल्या एखाद्या मित्राला तुमच्या फोनची गरज असेल. कदाचित एखादा सहकारी काही दिवसांपासून तणावात असेल. कदाचित एखादा जुना परिचित फक्त दोन प्रेमळ शब्दांची वाट पाहत असेल. म्हणून आज वेळ काढा. एखाद्याला फोन करा. त्याची विचारपूस करा. तो बोलत असेल तर मध्येच निष्कर्ष काढू नका; आधी त्याचे म्हणणे ऐका. कारण काही नाती मोठ्या भेटवस्तूंनी नाही, तर वेळ देऊन जपली जातात.
कुंदन जाधव आज आपल्यात नाहीत. त्यांची उणीव भरून निघणारी नाही. पण त्यांच्या जाण्याच्या निमित्ताने आपण एक गोष्ट नक्की शिकू शकतो माणसाला त्याच्या कामापेक्षा, पदापेक्षा आणि ओळखीपेक्षा आधी माणूस म्हणून समजून घेणे गरजेचे आहे. बातम्या येत राहतील. धावपळ सुरू राहील. कामाचा ताणही राहील. पण एखादा माणूस आपल्या आयुष्यातून कायमचा निघून गेल्यानंतर त्याला पुन्हा एकदा फोन करण्याची संधी मिळत नाही. म्हणून ज्यांची काळजी आहे, ती आजच व्यक्त करा. कुंदन जाधव यांच्या स्मृतीला हीच खरी आदरांजली ठरू शकते..!












