गौरव प्रकाशन प्रतिनिधी :
अमरावती : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 20 जुलै ते 30 जुलै या कालावधीत अमरावती विभागातून एकूण 254 जादा एसटी बसेस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहेत.
भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवास करता यावा यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यास आणखी बसेस उपलब्ध करून देण्याची तयारीही महामंडळाने ठेवली आहे.
कोणत्या आगारातून किती बसेस?
- अमरावती – 36
- बडनेरा – 36
- परतवाडा – 30
- वरुड – 36
- चांदूर रेल्वे – 21
- दर्यापूर – 30
- मोर्शी – 32
- चांदूर बाजार – 33
अशा प्रकारे एकूण 254 विशेष बसेस पंढरपूरच्या यात्रेसाठी धावणार आहेत.
गावातूनही थेट एसटीची सुविधा
महामंडळाने यंदा वारकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एखाद्या गावातून 40 किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी उपलब्ध असल्यास त्या गावातूनच थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस सोडली जाणार आहे. यासाठी संबंधित गावातील भाविक, सरपंच किंवा नागरिकांनी जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधावा.
परतीच्या प्रवासासाठीही आरक्षण
पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून परतीच्या प्रवासाचे आरक्षणही उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक विशेष बसमध्ये चालक आणि वाहक यांची नावे व मोबाईल क्रमांक स्पष्टपणे प्रदर्शित केले जाणार आहेत, त्यामुळे भाविकांना आवश्यकतेनुसार संपर्क साधणे सोपे होणार आहे.
प्रमुख मार्ग व भाडे
- अमरावती – पंढरपूर : ₹1046
- दर्यापूर – पंढरपूर : ₹1024
- परतवाडा – पंढरपूर : ₹1135
- वरुड – पंढरपूर : ₹1212
- चांदूर रेल्वे – पंढरपूर : ₹1112
- मोर्शी – पंढरपूर : ₹1146
- चांदूर बाजार – पंढरपूर : ₹1124
विभाग नियंत्रकांचे आवाहन
विभाग नियंत्रक सचिन डफळे यांनी जिल्ह्यातील वारकरी आणि भाविकांना जवळच्या एसटी आगारात संपर्क साधून आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित आणि विश्वासार्ह शासकीय बस सेवेचा लाभ घेऊन आषाढी यात्रेचा आनंद घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.






