प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांचे प्रतिपादन; पवई येथे मानवतावादी कवी संमेलन उत्साहात
गौरव प्रकाशन मुंबई | प्रतिनिधी
पांचपीर ट्रस्ट कार्यक्षेत्र भारत यांच्या वतीने आयोजित आणि सार्थक साहित्य प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी अशोक भवार यांच्या ‘काव्यमुदिता’ या बहुचर्चित काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक व विचारवंत नवनाथ रणखांबे होते.
या कार्यक्रमाला सार्थक साहित्य प्रकाशनाच्या संचालिका प्रा. आशा नवनाथ रणखांबे, पांचपीर ट्रस्टचे संचालक तथा साहित्यिक शाम परशुराम बैसाणे आणि बौद्ध विकास मंडळ पवईचे अध्यक्ष भाऊ पंडागळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच चंद्रमणी बुद्धविहार, आयआयटी मेनगेट, पवई येथे आयोजित मानवतावादी निमंत्रित कवी संमेलन ज्येष्ठ कवी बबन सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली रंगले.
प्रकाशन सोहळ्यात बोलताना प्रा. शुक्राचार्य गायकवाड म्हणाले,
“कविता बाहेर येते त्यावेळी ती समाजाची होते. अशोक भवार यांच्या ‘काव्यमुदिता’ या संग्रहातील कविता परिवर्तनाच्या, बदलाच्या आणि धम्माच्या आहेत.”
त्यांच्या या प्रतिपादनाला उपस्थित साहित्यप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अध्यक्षीय भाषणात नवनाथ रणखांबे यांनी काव्यसंग्रहाचे कौतुक करताना सांगितले की,
“कवी अशोक भवार यांचा ‘काव्यमुदिता’ कवितासंग्रह बुद्ध, धम्म, समता, करुणा आणि मानवतेचा संदेश देणारा विचारांचा दस्तऐवज आहे. त्यांच्या संवेदनशील लेखणीतून समाजातील वेदना, संघर्ष, प्रेम, नातेसंबंध, स्त्री-सन्मान, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक प्रबोधन यांचे प्रभावी चित्रण झाले आहे.”
ते पुढे म्हणाले,
“साहित्य हे माणसे जोडणारे असले पाहिजे. लेखक आणि कवींनी कोण काय म्हणेल याचा विचार न करता मानवतावादी, परिवर्तनवादी आणि समाजप्रबोधन करणारे साहित्य निर्माण करावे. दर्जेदार साहित्य नेहमी वाचले जाते. त्यामुळे साहित्यिकांनी सातत्याने लेखन, वाचन आणि चिंतन करणे आवश्यक आहे.”
प्रकाशिका प्रा. आशा रणखांबे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
“लेखकाच्या विचारांना दर्जेदार पुस्तकाचे रूप देणे ही सार्थक साहित्य प्रकाशनाची बांधिलकी आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर कार्य करत आम्ही साहित्यिकांना गुणवत्तापूर्ण प्रकाशनाची संधी उपलब्ध करून देत आहोत.”
तर साहित्यिक शाम बैसाणे म्हणाले,
“कवी अशोक भवार यांनी सामाजिक बांधिलकी आणि प्रबोधनाची परंपरा कवितांमधून जिवंत ठेवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. सार्थक साहित्य प्रकाशनाने हा कवितासंग्रह दर्जेदार बनवला आहे.”
भाऊ पंडागळे यांनीही अशोक भवार यांचे अभिनंदन करून पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुस्तक प्रकाशनानंतर आयोजित मानवतावादी निमंत्रित कवी संमेलनात नवनाथ रणखांबे, शाम बैसाणे, अशोक भवार, संतोष नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय अनंत धनसरे, धनंजय सरोदे, संदेश कर्डक, के. पुरुषोत्तम, प्रतीक कांबळे, सुरेखा गायकवाड, डॉ. सुशील बैसाणे, विकास भंडारे, वसंत हिरे, बाळासाहेब जोंधळे, वसंत वाघमारे, सुरेश घोडगे, जयलाभ धन पैठने, विश्वास कांबळे, महेश सावंत आदी कवींनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुरेखा गायकवाड यांनी केले. मानवता, सामाजिक समता, बंधुता, प्रेम, करुणा आणि परिवर्तनवादी विचारांनी परिपूर्ण कवितांमुळे संपूर्ण सभागृह काव्यमय झाले. उपस्थित साहित्यप्रेमी आणि रसिकांनी कवींच्या सादरीकरणास उत्स्फूर्त दाद दिली.







