गौरव प्रकाशन सिन्नर | प्रतिनिधी |
सिन्नर तालुक्यातील दोडी या छोट्याशा गावातील सुपुत्र तथा वृक्षमित्र लेखक विष्णू वाघ यांच्या ‘निपेऱ्या’ या साहित्यकृतीचे रविवारी (दि. २१ जून २०२६) सिन्नर येथील वारकरी भवनात उत्साहपूर्ण वातावरणात प्रकाशन करण्यात आले. ग्रामीण जीवन, बोलीभाषा, बदलत्या परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणाऱ्या या पुस्तकाला उपस्थित साहित्यप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले की, “निपेऱ्या या साहित्यकृतीत ग्रामीण मातीचा अस्सल गंध असून, वृक्षप्रेमाची पेरणी करणारा या पुस्तकाचा नायक मराठी साहित्याला वेगळे वळण देणारा आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे अप्पर कामगार आयुक्त रविराज इळवे उपस्थित होते. यावेळी मंचावर पेन पब्लिशिंग हाऊसचे प्रमुख तथा सुप्रसिद्ध साहित्यिक देवा झिंजाड, ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले, समीक्षक प्रशांत वाघ, ज्येष्ठ साहित्यिक संदीप राक्षे, बॉर्डरलेस पॅंथरचे संस्थापक देविदास तांबे, तानाजी वाघ, जनाबाई वाघ, मिराबाई वाघ, संदीप देसले, लेखक विष्णू वाघ आणि वैशाली वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आली. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वटवृक्षाचे पूजन व पाणी अर्पण करून उद्घाटन झाले. विशेष म्हणजे सत्कारासाठी शाल व पुष्पगुच्छाऐवजी झाडांची रोपे भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
प्रकाशक देवा झिंजाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “जे जगले, जे भोगले ते प्रांजळपणे शब्दबद्ध करणारा आणि मायमातीतील जिव्हाळा, गोडवा व ग्रामीण संस्कृतीतील जीवनमूल्ये हृदयस्पर्शी शैलीत मांडणारा विष्णू वाघ हा खऱ्या अर्थाने सच्चा लेखक आहे.”
अध्यक्षीय भाषणात रविराज इळवे यांनी ‘निपेऱ्या’ या पुस्तकाने कामगार साहित्याच्या दालनात मोलाची भर घातल्याचे सांगितले. पर्यावरण रक्षण, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे हे पुस्तक मराठी वाचकांच्या घराघरात पोहोचले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले, मसापचे कार्याध्यक्ष रवींद्र कांगणे, किरण भावसार, देविदास तांबे, कवी आत्माराम हारे, कांचन वाघ आणि बाल कीर्तनकार अनुजा उगले यांनी पुस्तकावरील आपले मनोगत व्यक्त केले. लेखक विष्णू वाघ यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास आणि प्रेरणा उपस्थितांसमोर मांडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कवयित्री जयश्री वाघ यांनी केले, तर सूत्रसंचालन कवयित्री सुनिता सानप सांगळे यांनी केले.
या सोहळ्यास शाहीर स्वप्निल डुंबरे, उडान फाउंडेशनचे भरत शिंदे, गुणवंत कामगार गणेश तांबोळी, भरत मांडे, रवींद्र गिरी, नगरसेवक अनिल सरवार, सुनिता वाळुंज, प्रा. संजय पवार, सत्यजित कळवणकर, सोपान सानप, उद्धव केकाने, अनिल वाघ, कैलास दुधाळे, अमोल चिने, अरुणा सांगळे, लता लहाने, रामदास वाघ, साहित्यिका प्रतिभा खैरनार, माधुरी चकणे, महेश वाघ, अनिल उगले, रामदास सांगळे, विकास गिते, अभिजित गुजराती, डॉ. सचिन गोंदके, डॉ. आनंदा सानप, नामदेव आव्हाड, पी. जी. आव्हाड, श्रीराम आव्हाड, मंगल शेळके, बाळासाहेब नागरे, लक्ष्मण शेळके, डॉ. आंधळे, महेश तांबे, गणेश शेळके, रोशन घुगे आणि सुशीला उगले यांच्यासह मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.







