युगद्रष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख  एक संग्राह्य ग्रंथ

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
युगद्रष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख  एक संग्राह्य ग्रंथ
आज दि.10 एप्रिल 2023 ला असलेल्या डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ” युगद्रष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख एक संग्राह्य ग्रंथ ” हा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.
————————————-
आज दि.10 एप्रिल 2023 रोजी असलेल्या शिक्षण महर्षी -कृषी महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
 भाऊसाहेब देशमुख यांना लहानपणापासूनच शेतकऱ्यांविषयीची जाण होती, कळवळा होता कारण ते जन्माने आणि कर्माने भूमिपुत्र होते . शेतकऱ्यांच्या सहवासात त्यांचे बालपण गेले म्हणून त्यांना भारतीय शेती जगाच्या तुलनेत मागे असल्याची जाणीव होती . भारताचा विकास शेतीच्या विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.हा त्यांचा विचार आजही तेवढाच मोलाचा आहे,त्यांनी तत्कालीन काळात  शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजना व धोरणे आज राबविल्या गेली तर एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या न होता शेतकरी सुखी व समृद्ध होईल,असे अनेक पैलू डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवन संघर्षाचे आहेत.ते सर्व पैलू एकत्र करण्याचा प्रयत्न ज्या ग्रंथात प्रत्यक्ष करण्यात आला आहे त्या ग्रंथाचे नाव आहे “युगद्रष्ट्रा सत्यशोधकडॉ.पंजाबराव देशमुख “
        डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख संस्थापित श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित धनवटे नॅशनल कॉलेज,नागपूरचे प्रभारी प्राचार्य तथा संयोजक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.पी.एस.चंगोले यांनी संपादित केलेला आणि मा.श्री हर्षवर्धनजी देशमुख ,अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांनी प्रकाशित केलेला ” युगद्रष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख ” हा 250 पृष्ठसंख्या असलेला ग्रंथ वाचण्यात आला.भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे दर्शन घडविणारा शिवसेवकांनीच नव्हे तर प्रत्येकाने संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ मनाला स्पर्शून गेला म्हणून या ग्रंथाचा परिचय देण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
        डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे राष्ट्रीय योगदान नव्या पिढीला माहित व्हावे या उदात्त हेतूने धनवटे नॅशनल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनात दि.10 एप्रिल 2006 पासून डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमालांचे नियमितपणे आयोजन करण्याचा उपक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला . श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष  अॅड. मा.अरुणभाऊ शेळके,मा.श्री वसंतरावजी धोत्रे तथा विद्यमान अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख यांच्या प्रोत्साहनामुळे हा उपक्रम सुरू झाला.उपक्रमामध्ये डॉ.बबन नाखले यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
      श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मा.श्री वसंतरावजी धोत्रे यांनी या उपक्रमाच्या पहिल्या उद्घाटकीय भाषणाचे अध्यक्षस्थान भूषविले होते.या संयुक्त उपक्रमात विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.एन.एन.सास्ते व प्राचार्य डॉ. डी.के.बुरघाटे , प्रभारी प्राचार्य मा.पी.एस.चंगोले तथा प्राध्यापक व विद्यार्थी यांचाही उल्लेखनीय सहभाग राहिला आहे.दि.10 एप्रिल 2006 पासून दि.10 एप्रिल 2017 पर्यंत एकूण 17 विचारवंतांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.महाराष्ट्रासह विविध राज्यातील नामवंत,अभ्यासक, लेखक,विचारवंत यांना निमंत्रित करण्यात आले होते.त्यांनी भाऊसाहेबांवरील दिलेली भाषणे शब्दबद्ध होऊन ती ग्रंथरूपाने  प्रकाशित व्हावी या उदात्त भावनेतून ” युगद्रष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख ” हे राष्ट्रजागृती ग्रंथमाला मधील तिसरे पुष्प साकारून दि.10 एप्रिल 2018 रोजी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 53 व्या स्मृतिदिनानिमित्त  मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झालेले आहे.
     श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे विद्यमान अध्यक्ष व या ग्रंथाचे प्रकाशक मा.श्री हर्षवर्धनजी देशमुख यांनी
” मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानातून साकार झालेला ‘युगदृष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख ‘ हा प्रेरणादायी व गतिमान शब्दरूप प्रवास आहे .”असे आपल्या प्रकाशकीय मनोगत म्हटले आहे . तर या ग्रंथाचे संपादक प्रभारी प्राचार्य डॉ.पी.एस.चंगोले यांनी ” युगद्रष्टा डॉ.पंजाबराव देशमुख  ” या ग्रंथाद्वारे डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवन संघर्षातील प्रकाश किरणे नव्या पिढीला अवश्य प्रकाशित करतील असा विश्वास वाटतो .”असे आपल्या मनोगतात म्हटले आहे.
      ” युगद्रष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख” या ग्रंथांमध्ये एकूण सतरा प्रकरणातून सतरा मान्यवर विचारवंतांच्या डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्य व व्यक्तिमत्त्वातील विविध पैलुंवर केलेल्या विषयावरील व्याख्यानांचे वस्तुनिष्ठ शब्दांकन करण्यासाठी श्री.भीमराव वैद्य,प्रा.प्रभाकर पावडे,श्री सुनील इंदू वामन ठाकरे आणि सौ.शीतल प्रशांत तांबे यांनी खूप मोलाचे योगदान दिलेले आहे.
     पहिल्या प्रकरणात डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिना निमित्त दि.10 एप्रिल 2006 ला ” डॉ.पंजाबराव देशमुख यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बहुजन समाज ” या विषयावर रयत शिक्षण संस्था साताराचे अध्यक्ष प्रा.एन.डी. पाटील यांचे व्याख्यान शब्दबद्ध केलेले आहे. या व्याख्यानामध्ये प्रा.एन.डी.पाटील यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन बहुजन समाजाने आचरणात आणण्याचे प्रतिपादन केले.
      ” समाज परिवर्तन चळवळीत डॉ.पंजाबराव देशमुख यांचे योगदान “या विषयावर डॉ.शशिकांत सावंत ,माजी प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख,विक्रम विद्यापीठ,उज्जैन मध्यप्रदेश यांचे व्याख्यान शब्दबद्ध केलेले आहे. या व्याख्यानामध्ये त्यांनी भाऊसाहेबांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याचे अभ्यासपूर्ण मूल्यमापन केलेलं आहे.
         तिसऱ्या प्रकरणात डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिना निमित्त दि.10 एप्रिल 2007 ला ” डॉ.पंजाबराव देशमुख यांनी केलेली धर्म  चिकित्सा “या विषयावर डॉ.मधुकर वाकोडे ,माजी अधिष्ठाता कला विद्याशाखा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी “डॉ.भाऊसाहेब हे धर्मचिकित्सक होते पण 75 वर्ष या माणसाचं कार्य अंधारात ठेवण्याचं काम या देशातल्या बुद्धिजीवी वर्गाने केलेलं आहे .” असे वास्तववादी विचार व्यक्त करून डॉ.पंजाबराव देशमुख यांनी केलेली धर्म चिकित्सा सविस्तरपणे सांगितलेली आहे. जी वाचकांनी अवश्य वाचलीच पाहिजे.
        चौथ्या प्रकरणात  दि.10 एप्रिल 2008 ला “डॉ.पंजाबराव देशमुख यांचे समाज परिवर्तन चळवळीला गतिमान करण्यात राष्ट्रीय योगदान ” या विषयावर डॉ.रावसाहेब कसबे,डॉ.बाबासाहेबआंबेडकर अध्यासन ,पुणे विद्यापीठ,पुणे यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडलेले आहेत.
       पाचव्या प्रकरणात दि.10 एप्रिल 2008 ला डॉ.मनोज तायडे ,मराठी विभाग प्रमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ,अमरावती यांनी “डॉ.पंजाबराव देशमुख यांना अपेक्षित असलेले सांस्कृतिक परिवर्तन  ” या विषयावरील मांडलेले विचार अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
      सहाव्या प्रकरणात  दि.10 एप्रिल 2009 ला डॉ.आनंद पाटील माजी प्रमुख व प्राध्यापक इंग्रजी विभाग,गोवा विद्यापीठ ,गोवा यांनी “डॉ.पंजाबराव यांचे राष्ट्रीय योगदान ” या विषयावर केलेल्या विचारांची मांडणी वाचनीय आहे.
          सातव्या प्रकरणात दि.10 एप्रिल 2009 ला डॉ.पंजाबराव देशमुख आणि कर्मयोगी संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ” या विषयावर प्रा.सुधाकरराव मोहोड , अर्थशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक , धनवटे नॅशनल कॉलेज,नागपूर यांनी  व्याख्यानातून  दोन संतांची व दोन थोर पुरुषांची  वैचारिक भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे.
     आठव्या प्रकरणात दि .10 एप्रिल 2010 ला ” भारतीय समाज व्यवस्था परिवर्तनात डॉ.पंजाबराव देशमुख यांचे योगदान ” या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,औरंगाबाद या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नागनाथ कोतापल्ले यांचे व्याख्यान तर
नवव्या प्रकरणात प्रा.हरि नरके , सल्लागार , नियोजन आयोग भारत सरकार नवी दिल्ली व विभाग प्रमुख महात्मा जोतीराव फुले अध्यासन,पुणे विद्यापीठ,पुणे यांचे  ” भारताचे संविधान आणि डॉ.पंजाबराव देशमुख  ” या विषयावर दिलेले अभ्यासपूर्ण व्याख्यान आहे.
       दहाव्या प्रकरणात दि.10 एप्रिल 2011 ला झालेल्या व्याख्यानमालेत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. श्री सुरेंद्र भुयार यांचे “डॉ.पंजाबराव देशमुख यांना अभिप्रेत असलेले सांस्कृतिक परिवर्तन  ” या विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलेले आहे.
      अकराव्या प्रकरणात दि.10 एप्रिल 2011 ला झालेल्या व्याख्यानमालेत प्रा.प्रभाकर पावडे, उप -प्राचार्य ,पी.डब्ल्यू.
एस.कॉलेज,नागपूर यांचे  ” डॉ . पंजाबराव देशमुख,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संतश्रेष्ठ गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिप्रेत असलेले समाजप्रबोधन ” या विषयावरीलअ भ्यासपूर्ण व्याख्यान दिलेले आहे.
         बाराव्या प्रकरणात दि.10 एप्रिल 2012 ला झालेल्या व्याख्यानमालेत ” बळीराजा ते डॉ.पंजाबराव देशमुख ” या विषयावरील डॉ.आ.ह.साळुंखे सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत,सातारा यांचे अभ्यासपूर्ण झालेले व्याख्यान शब्दबद्ध केलेले आहे.
      तेराव्या प्रकरणामध्ये दि.10 एप्रिल 2013 ला झालेल्या व्याख्यानमालेत डॉ.विठ्ठल वाघ, माजी प्राचार्य श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला यांच्या  ” डॉ.पंजाबराव देशमुख यांना अपेक्षित असलेले सांस्कृतिक परिवर्तन व हिंदू देवस्थान बिल ” या विषयावर अभ्यासपूर्ण झालेले व्याख्यान दिलेले आहे.
      चौदाव्या प्रकरणात दि.10 एप्रिल 2015 ला झालेल्या व्याख्यानमालेत  ” भारतीय शेतकऱ्यांची दशा व दिशा तसेच वर्तमान कृषिधोरण आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांनी सुचविलेले उपाय ” या विषयावरील डॉ.आर.एस. देशपांडे ,माजी संचालक, इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज, बंगलोर यांचे अभ्यासपूर्ण झालेले व्याख्यान दिलेले आहे.
    पंधराव्या प्रकरणात दि.10 एप्रिल 2015 ला झालेल्या व्याख्यानमालेत श्री चंद्रकांत वानखेडे ,माजी संपादक,दैनिक सकाळ ,विदर्भ आवृत्ती ,नागपूर यांचे  ” संत गाडगेबाबा,राष्ट्रसंत तुकडोजी आणि डॉ.पंजाबराव देशमुख एकाच चळवळीचे साथीदार ” या विषयावर झालेले अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलेले आहे.
     सोळाव्या प्रकरणात दि.10 एप्रिल 2016 ला झालेल्या व्याख्यानमालेत  ” डॉ.पंजाबराव देशमुख यांचे कृषी ,शैक्षणिक व सामाजिक चळवळीतील योगदान ” या विषयावरील डॉ.साहेब खंदारे  ,प्राचार्य ,माधवराव पाटील महाविद्यालय,पालम ,जि. परभणी यांचे झालेले अभ्यास पूर्ण व्याख्यान दिलेले आहे.
        सतराव्या प्रकरणात दि.10 एप्रिल 2017 ला झालेल्या व्याख्यानमालेत श्री प्रवीण गायकवाड,माजी प्रदेश अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड,महाराष्ट्र राज्य,नेते – शेतकरी कामगार पक्ष ,महाराष्ट्र राज्य यांनी  “डॉ.पंजाबराव देशमुख आणि आरक्षण ” या विषयावर झालेले आभ्यासपूर्ण व्याख्यान दिलेले आहे.
     या सतराही प्रकरणांमध्ये  डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांचे फोटो दिलेले असल्यामुळे शब्दबद्ध केलेले प्रत्येक व्याख्यान वाचताना वाचकांना जिवंतपणा वाटतो.इतकेच नव्हे तर येथे विचारवंत आपल्यासमोर व्याख्यान देत आहेत असे वाचकांना ते ते व्याख्यान वाचताना वाटल्याशिवाय राहत नाही इतका जिवंतपणा या व्याख्यानांमध्ये आहे.
     “युगद्रष्टा सत्यशोधक डॉ . पंजाबराव देशमुख ” या ग्रंथाच्या शेवटी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगाचे चित्र सुद्धा प्रकाशित केलेले आहेत तसेच डॉ. पंजाबराव देशमुख यांचा संक्षिप्त जीवनपट सुद्धा दिलेला आहे.
        चित्रकार श्री प्रदीप पवार यांनी साकारलेले आकर्षक आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ आहे आणि मलपृष्ठावर डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा “कृषकांचा चौदा कलमी कार्यक्रम ” प्रकाशित केलेला आहे.
        डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवन कार्यातील व व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे अभ्यासपूर्ण सतरा  विचारवंतांची सतरा व्याख्याने जी या ग्रंथात शब्दबद्ध केलेली आहेत ती वाचकांना आवडलेली असून वाचकही या ग्रंथाला भरपूर प्रतिसाद देतआहेत. या ग्रंथाचे प्रकाशक , संपादक आणि शब्दांकन करणारे मान्यवर यांनी केलेल्या परिश्रमाचे फळ म्हणजे हा ग्रंथ आहे असे म्हणता येईल. यापुढेही या ग्रंथाला वाचक भरपूर प्रतिसाद देतील ही आशा.
डॉ.पंजाबराव देशमुख  एज्युकेशनल नॅशनल अवॉर्ड   प्राप्त
समीक्षक
-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणी नगर,अमरावती.
मो.न. ८०८७७४८६०९
पुस्तकाचे नाव :
“युगद्रष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख “
प्रकाशक : श्री हर्षवर्धन देशमुख,
अध्यक्ष,श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती .
संपादक      :  डॉ.पी.एस.चंगोले
               मो नं.९४२२११५३१९
पृष्ठसंख्या    :  250
सहयोग राशी : 150 /-

0 thoughts on “युगद्रष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख  एक संग्राह्य ग्रंथ”

  1. I liked comments on the book edited by Hon.mr.P.S.Changole sir “युग द्रष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख”
    💐💐💐💐💐💐💐💐💐

    Reply

Leave a comment