निखील देशमुख धामणगाव रेल्वे प्रतिनिधी :
धामणगाव शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणींविरोधात धामणगाव तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी तसेच विद्यार्थी व पालकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेले ठिय्या आंदोलन अखेर यशस्वी ठरले. आंदोलनाच्या दबावामुळे नगरपरिषदेला अखेर आगार व्यवस्थापकाला पत्र देऊन बसेस पूर्ववत सुरू करण्यास भाग पाडले गेले.
माहितीनुसार, धामणगाव शहरात येणाऱ्या बसेस रस्त्याच्या कामाचे कारण देत नगरपरिषदेकडून मंगरूळ फाट्यावरून वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मंगरूळ फाट्यापासून शास्त्री चौकापर्यंत सुमारे तीन किलोमीटर पायी प्रवास करावा लागत होता. यामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, नगरपरिषदेकडील अनियमित कारभार आणि कमिशनखोरीमुळे 2024 पासून सुरू असलेले रस्त्याचे काम 2026 पर्यंतही पूर्ण झाले नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, विद्यार्थी आणि पालकांनी नगरपरिषदेला निवेदन देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले. “जोपर्यंत बसेस सुरू होत नाहीत आणि आगार व्यवस्थापकाला पत्र दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.
सुमारे दोन ते अडीच तास आंदोलन सुरू राहिले. सुरुवातीला प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मात्र पत्रकार, शहरातील नागरिक आणि वाढता दबाव यामुळे अखेर नगरपरिषदेला आगार व्यवस्थापकाला बसेस सुरू करण्यासाठी पत्र द्यावे लागले.
या आंदोलनात ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज वानखडे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंदू डहाणे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष शिंदे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मयूर डुबे, निवृत्ती वैद्य, शुभम भोंगे, गोपाल मांडूळकर, पवन खुरपडे, राजेश कांबे, सुधीर शेळके, अशोकराव गोफने, गणेश खैर, नितेश खंडारे, अमोल भेंडे, सुभाष सावंत, विशाल डुबे, सागर धांदे, रमेश ठाकरे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी केळी, चॉकलेट, बिस्कीट आणि पाण्याची व्यवस्था केली होती. याबद्दल सर्व आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.






