भेसळीच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाचा मोठा अॅक्शन; शेगावातील हॉटेल, प्रसाद व खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ
बुलढाणा | प्रतिनिधी
राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्नसुरक्षेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. गुटखा, तंबाखू आणि हॉटेल व्यवसायांवरील कारवाईनंतर आता या मोहिमेचा फोकस धार्मिक स्थळांवरील प्रसाद व मिठाई विक्रेत्यांकडे वळला आहे.
याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत श्री गजानन महाराज मंदिर परिसरात अन्न व औषध प्रशासनाने अचानक धाड टाकत प्रसाद, पेढे आणि इतर मिठाई विकणाऱ्या दुकानांची तपासणी केली. भेसळयुक्त मिठाई विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
तपासणीदरम्यान विविध मिठाई व खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील चाचणीसाठी घेण्यात आले. तपासणीत नियमांचे उल्लंघन किंवा भेसळ आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सांगितले की, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर भेसळमुक्त अन्न विक्रीसाठी विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. धार्मिक स्थळांवरील प्रसाद, मिठाई, पाणीपुरी स्टॉल्स तसेच उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
या कारवाईनंतर शेगावातील प्रसाद विक्रेते, मिठाई दुकानदार, हॉटेल व्यावसायिक आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेतली जात आहे.
दरम्यान, यापूर्वी भिवंडीतील एका मोठ्या गोदामावरही अन्न सुरक्षा विभागाने कारवाई करत मुदतबाह्य अन्नपदार्थ पुन्हा विक्रीसाठी पाठविण्याचा प्रकार उघड केला होता. त्यामुळे राज्यभर अन्न भेसळ रोखण्यासाठी प्रशासन अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे.








