![](https://www.gauravprakashan.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231004-WA0033.jpg)
अमरावती जिल्ह्यातील पिक विम्याचे अनुदान शेतकऱ्यांचे खात्यावर जमा करा !
आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतली अजितदादा पवार, धनंजय मुंडे यांची भेट !
वरूड (तालुका प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना 2022-23 अंतर्गत अंबिया बहारामध्ये मोर्शी वरूड तालुक्यासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी फळपिक विमा काढला होता. यात संत्रा, मोसंबी, केळी या फळांचा विमा शेतकऱ्यांनी काढलेला होता. मात्र ४ महिन्यांचा कालावधी लोटून सुद्धा आजपर्यंत हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पिक विम्याची मदत शासनाच्या व विमा कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे संत्रा उत्पादक शेतकरी विमा मदतीपासून वंचित असून आस्मानी संकटामूळे झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांना मंजूर विम्याची मदत ८ दिवसात संपूर्ण व्याजासह संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे,यांच्याकडे केली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२२-२३ मध्ये खरीप पिकाखाली वरुड तालुक्यात २६२६ शेतकरी तसेच मोर्शी तालुक्यात १२२५९ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे.वरुड तालुक्यात १२०४ आणि मोर्शी तालुक्यात ४३७० शेतकऱ्यांचा विमा हप्ता अद्यापर्यंत जमा झालेला नाही. तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत हवामान आधारीत फळविमा योजना सन २०२२- २३ मध्ये आंबिया बहारासाठी मोर्शी तालुक्यातील १०२३ शेतकरी आणि वरुड तालुक्यातील ८५७ शेतकऱ्यांचा सहभाग घेऊन पिक विमा काढला असून तो विमा मंजूर झालेला आहे परंतू राज्य हिस्सा आणि केंद्र हिस्सा अद्यापर्यंत रिलायन्स कंपनीकडे जमा न केल्यामुळे शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळू शकली नसल्यामुळे पिक विमा रक्कम शेतकऱ्यांचे खात्यात जमा होणेबाबत आदेश निर्गमीत करून शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम तत्काळ जमा करण्यात यावी अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.