Saturday, May 2

“सुखी जीवनाचा मार्ग: गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, चार आर्य सत्ये आणि पंचशील”

“गौतम बुद्ध ध्यानस्थ मूर्ती – चार आर्य सत्ये, अष्टांगिक मार्ग आणि पंचशील यांचे प्रतीकात्मक चित्र”

संतुलित मानवी जीवनासाठी गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान अंगिकारुयागौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे दुःखमुक्ती, समता, करुणा आणि विज्ञाननिष्ठ विचारांवर आधारित आहे. मानवी जीवनातील दुःखाचेमुळ कारण तृष्णा असल्याचे सांगून बुद्धांनी चार आर्य सत्ये आणि अष्टांगिक मार्गा द्वारे निर्वाण (सर्वोच्च सुख / मुक्ती ) मिळवण्याचा मार्ग दाखविला आहे. हे तत्त्वज्ञान तर्कशुद्ध आणि मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारे आहे.
चार आर्य सत्य-
1) दुःख : जगात दुःख आहे (जन्म, मरण, आजार शोक )
2) दुःख समुदाय : दुःखाचे कारण तृष्णा किंवा इच्छा आहे
3) दुःख निरोध : तृष्णा नष्ट केल्यास दुःख दूर होऊ शकते (निर्वाण)
4) दुःख निरोध गामिनी प्रतिपदा दुःखातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग अष्टांगिक मार्ग आहे
अष्टांगिक मार्ग
1) सम्यक दृष्टी : सत्य काय आहे ते समजणे
2) सम्यक संकल्प : वाईट विचारांचा त्याग करून चांगले विचार करणे
3) सम्यक वाचा : सत्य आणि गोड बोलणे
4) सम्यक कर्मात : अहिंसक आणि चांगले वर्तन करणे
5) सम्यक आजीविका : प्रामाणिक मार्गाने उपजीविका करणे
6) सम्यक व्यायाम : मनावर ताबा मिळवून मानसिक शक्ती वाढवणे
7) सम्यक स्मृती : मनाची एकाग्रता राखणे
8) सम्यक समाधी : खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करणे
मूलभूत विचार
अनित्यता – जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही सर्व काही परिवर्तनशील आहे.
अनिस्वरवाद – बुद्ध देव किंवा ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहीत ते कर्माला महत्त्वाचे मानतात.
अहिंसा – प्राणीमात्रे वर दया करणे आणि हिंसा न करणे
पंचशील – पाच नियम ( हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटे न बोलणे, नशा न करणे (पाळणे)
बुद्धांचे तत्वज्ञान हे अंधश्रद्धेवर आधारित नसून ते मानवाला तर्कशुद्ध विचार करायला आणि स्वतःच्या दुःखातून स्वतःच मार्ग काढायला शिकवते. ज्याला अत्ता दीप भव (स्वतःचा प्रकाश स्वतःच व्हा) असे म्हटले जाते.


सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात जगात दुःख आहे. दुःखाचे कारण तृष्णा आहे. मानव जेव्हा जन्माला येतो तर मरेपर्यंत त्याची तृष्णा पूर्णच होत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की काही कालांतराने दुसरी इच्छा मनात उत्पन्न होते. ती पूर्ण होईस्तव मानव हा दुःखी असतो. ही इच्छा पूर्ण झाली की काही दिवस तो शांत राहतो आणि काही कालांतराने नवीन इच्छा तयार होते. परत तो नाराज होतो. असे कालचक्र हे जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरूच राहते.


सध्या जगात युद्ध सुरू आहे ही पण एक अमेरिकेची तृष्णाच आहे. वास्तविक अमेरिका हा बलाढ्य देश आहे. त्याला कशाचीही कमी नाही. परंतु त्या देशाला संपूर्ण विश्वावर राज्य करायचे आहे. हुकूमत करावयाची आहे म्हणून अमेरिकेचे दुःखाचे कारण तृष्णा आहे. दुसरे असे की अमेरिकेला संपूर्ण तेलसाठे त्यांच्याच नियंत्रणात पाहिजे आहे. ही सुद्धा एक तृष्णाच आहे म्हणून दुःख आहे. गौतम बुद्धांनी पंचशीलाचे तत्वज्ञान सांगितले आहे. या पंचसूत्राची संपूर्ण मानव जातीचा जीवनमार्ग कसा सुखकर होईल एकदम साध्या सोप्या मार्गाने सांगितले आहे. काय आहे हे पंचसूत्री तत्त्वज्ञान हे बघूया-


1) हिंसा करू नये – हिंसा ही कुठलीही वाईटच आहे. मग ती शिकारीची असो की बदल्याच्या भावनेतून घेतलेली असो. हिंसा केल्यामुळे द्वेष निर्माण होतो वैर निर्माण होते. वैराने वैर वाढते. सध्या युद्ध सुरू आहे या युद्धात बरीच हिंसा झाली आहे. या हिंसेत पहिल्याच दिवशी इराणच्या राष्ट्राध्यक्षाची हत्या करण्यात आली. ज्या कोणी देशाच्या राष्ट्राध्यक्षाची हत्या होईल त्यामध्ये बदल्याची भावना नक्कीच निर्माण होईल. कारण नसताना इराणमध्ये मुलींच्या शाळेवर हल्ला करण्यात आला. त्यात नाहक शेकडो मुलींचे प्राण गेले.


ह्यात कोवळ्या मुलांचा काय दोष आहे बरे. ह्यात मुल दगावली त्यांच्या बालकांना किती दुःख झाले असेल आणि त्यांच्या मनात किती राग निर्माण झाला असेल हे साहजिकच आहे. म्हणून हिंसा करू नये. जीव जातो व तो कितीही क्रूर असला तरी याची रुख राख त्याच्या मनामध्ये राहतेच की आपण उगीच हत्या केली म्हणून. ह्या हिंसे मध्ये ज्याची हत्या होते तो पण मरतो आणि जो करतो तो पण मरतो. हिंसा दरवेळी हत्येची किंवा जीव घेणारीच नसते. कधी कधी शाब्दिक हिंसा सुद्धा असते. काहींना कारण नसताना मोठ्या आवाजात अवार्च शिवीगाळ करण्याची सवय असते. इतरांसमोर अपमान करण्याची सवय असते. यामुळे बरीच मन दुखावली जातात. ही शाब्दिक हिंसा काही प्रत्यक्ष हिंसेपेक्षा कमी नसते. त्यामुळे सगळीकडे अशांतता पसरू शकते.


2) चोरी न करणे – कुठलीही चोरी करणे हे वाईटच कारण की इतरांनी जमवलेली संपत्ती कित्येक वर्षाची मेहनत असते. चोरी केल्यामुळे ज्याने धन संपत्ती जमवली आहे त्याची आयुष्यभराची कमाई चालली जाते. आणि अतोनात दुःख होऊन त्याला भयंकर यातना सुद्धा होतात. तसेच जो चोरी करतो तो जर पकडला गेला तर त्याला शिक्षा होते. वाईट कृत्य केल्यामुळे तरुणाच्या करिअरचे आयुष्य भराचे नुकसान होऊ शकते. कुठलीही चोरी करणे वाईटच.


3) व्यभिचार न करणे – व्यभिचार करणे हे फार वाईटच. आज बरेच ढोंगी बाबा हे अनेक महिलांना खोटे आमिष दाखवून व्यभिचार करत असतात. त्यामुळे त्या महिलांची बदनामी समाजात होते. व्यभिचार केल्यामुळे चरित्रावर डाग लागतो. तो कधीही पुसून निघत नाही. अशा महिला, पुरुषांना वाईटच बघितल्या जात. समाज अशा गोष्टींना मान्यता देत नाही. त्याची सामाजिक प्रतिष्ठा राहत नाही. व्यभिचार केल्यामुळे शारीरिक रोग सुद्धा होण्याचा धोका असतो. यामुळे याची लागण त्याला त्याची लागण त्याला होऊन कुटुंबाचे समाजाचे व शेवटी राष्ट्राचे आरोग्य बिघडते. व्यभिचारामुळे बराच आर्थिक भुर्दंड सुद्धा सोसावा लागतो. यामुळे भांडण होऊन कधी कधी टोकाचे भांडण होऊन हत्या पण होते. त्यामुळे सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात शीलाला खूप महत्त्व आहे. हे आपण जपले पाहिजे. म्हणून व्यभिचाराच्या चार हात दूर असलेलेच बरे.


4) खोटे न बोलणे – बऱ्याचदा खोटे बोलल्यामुळे इतरांचे अतोनात नुकसान होते. खोटे बोलण्याची बऱ्याच जणांना सवय असते. काही जणांना जलन असते. मत्सर असतो. त्याला इतरांचे चांगले बघवत नाही. मग तो खोटे बोलून त्याची प्रतिमा कारण नसताना मलिन करतो. हे जरी खरे असले की सत्य हे कधीही पराभूत होत नाही पण ह्याला बराच अवधी लागतो. तोपर्यंत बरेच नुकसान झालेले असते. खोटे बोलून समाजात दंगा मस्ती होऊन हिंसा पण होऊ शकते. एवढे नुकसान खोटे बोलल्यामुळे होऊ शकते. खोटे काही दिवस इतरांना परेशान जरूर करू शकते. पण ज्यांना इतरांना कळतं की ही व्यक्ती खोटी बोलते तेव्हा या खोटे बोलणाऱ्याचे बरेच नुकसान होते. ह्या खोटे बोलणाऱ्या व्यक्तीवर कोणीही विश्वास ठेवत नाही. या व्यक्तीचे अतोनात आयुष्यभर नुकसान होते म्हणून खोटे बोलू नये.
5) नशा न करणे : कुठलीही नशा करणे ही वाईटच. नशा केल्यामुळे आपले स्वास्थ बिघडतं. शरीराचं वाटोळं होतं. नशा केल्यामुळे आपल्या शरीराचे महत्त्वपूर्ण अवयव हे निकामी होतात. जे की आपल्यासाठी फार अमूल्य असतात. बरीच तरुण मुलं नशेच्या अधीन गेलेले असतात. त्यामुळे त्यांच्या करिअरवर वाईट परिणाम होतो. नशेच्या आहारी गेल्यामुळे कुटुंबाचा आधार चालला जातो.

तरुणाई नशेत गेली तर कुटुंबाचे, समाजाचे व अर्थात राष्ट्राचे सुद्धा नुकसान होते. बऱ्याचदा ज्याच्यावर कुटुंब अवलंबून असतं तेच नशेच्या आहारी गेलेले असतात यामुळे कुटुंबाचे आर्थिक नुकसान होतं. नशेसाठी बरेच पैसे खर्च होतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे फार कठीण जात. त्यामुळे कुटुंबाची हेळसांड होते. मुळाबाळांच्या शिक्षणावर, आरोग्यावर पैसे खर्च करण्यासाठी शिल्लक राहत नाही. मुलांचे शिक्षण होत नाही. योग्य शिक्षणाची संधी न मिळाल्यामुळे मुलांचे करिअर कायमच न भरून निघणार नुकसान होतं. असे पाच अनमोल पंचशीलाचे मूलमंत्र आहेत. एवढा सोपा जीवनाचा महत्त्वपूर्ण संदेश या पंचशीलाने दिलेला आहे. जे की सामान्य नागरिकांना अंगीकारणे शक्य आहे. हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटे न बोलणे व नशा न करणे या पंचशीलाचे कोणीही सहजपणे पालन करू शकतो व आपले मानवी जीवन विना त्रासाचे आरामात जगू शकतो.


या पंचशीला कडे आपण जरा बारकाईने बघितले की या पंचसूत्रांचे पालन न केल्यामुळेच तर मानवाच्या जीवनात समस्या निर्माण होतात. हिंसा केली की शिक्षा, चोरी केली की शिक्षा, व्यभिचार केला की शिक्षा, खोटे बोलले की शिक्षा व नशा केली की शिक्षा होते किंवा गुन्हा नोंदविला जातो. ह्या मानवाच्या जीवनात ज्या काही कटकटी निर्माण होतात ते केवळ पंचशीलाचा अवलंब न केल्यामुळेच. म्हणून सुखी जीवनासाठी मानवाने सिद्धार्थ गौतम बुद्धाचे तत्वज्ञान अंगीकारणे गरजेचे आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा हे लागू होतं कारण की गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान हे वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे आहे. चला ह्या मंगलदिनी सिद्धार्थ गौतम बुद्धाचे तत्वज्ञान अंगीकारण्याचा संकल्प करूया. बौद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

Arvind More

अरविंद सं.मोरे,

नवीन पनवेल ( पूर्व)

मो.9423125251

● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!



Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.