निखील देशमुख गौरव प्रकाशन न्यूज
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील कामणापूर घुसळी, काशी खेड आणि वाढोणा या तिन्ही गावांतील नागरिकांनी आज दि. 02 जुलै 2026 रोजी नारगांवडी येथील एमएसईबी कार्यालयावर मोठ्या संख्येने धडक देत तीव्र संताप व्यक्त केला. ग्रामीण भागात सतत रात्रभर वीजपुरवठा खंडित राहणे, लाईन वारंवार ये-जा करणे आणि दिवसातील तब्बल 12 तास वीज बंद असतानाही ग्राहकांना 4 ते 5 हजार रुपयांची वीजबिले येत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा लेखी निवेदने देऊनही अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. आज नागरिक समस्या मांडण्यासाठी कार्यालयात पोहोचले असता एकही अधिकारी उपस्थित नव्हता. अधिकाऱ्यांना फोन केल्यावर त्यांनी “रजेवर आहोत” असे कारण सांगितल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला.
तिन्ही गावांतील नागरिकांनी आरोप केला की, संबंधित अधिकारी मुख्यालयात मुक्कामी राहत नाहीत. सर्व अधिकारी अमरावती येथून ये-जा करतात. त्यामुळे स्थानिक समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून, विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
याशिवाय, गावातील अनेक विद्युत दिपे (स्ट्रीट लाईट) नादुरुस्त अवस्थेत असून ग्रामीण भाग अंधारात आहे. नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधून स्पष्ट इशारा दिला की, “यापुढे वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर एमएसईबी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात येईल.”
सध्या या तिन्ही गावांतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन वीज समस्या मार्गी लावण्याची मागणी होत आहे.







