अमरावती | प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 3 लाख शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर करण्यात आली असून, या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील 12 प्रमुख बँकांमधील 2 लाख 2 हजार 167 थकीत कर्जदार शेतकरी 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या कर्जमाफीसाठी सुमारे 2,338 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
याशिवाय वेळेवर पीककर्जाची परतफेड करणाऱ्या 93 हजार 139 नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार असून, त्यासाठी 524 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वाधिक लाभार्थी
बँकनिहाय आकडेवारीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 71 हजार 655 खात्यांसाठी सुमारे 700 कोटी रुपये कर्जमाफीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 41 हजार 135 खात्यांसाठी 513 कोटी रुपये, तर बँक ऑफ महाराष्ट्रच्या 29 हजार 980 खात्यांसाठी 488 कोटी रुपये प्रस्तावित आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वाधिक लाभार्थी
बँकनिहाय आकडेवारीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 71 हजार 655 खात्यांसाठी सुमारे 700 कोटी रुपये कर्जमाफीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 41 हजार 135 खात्यांसाठी 513 कोटी रुपये, तर बँक ऑफ महाराष्ट्रच्या 29 हजार 980 खात्यांसाठी 488 कोटी रुपये प्रस्तावित आहेत.
याशिवाय सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 29 हजार 10 शेतकऱ्यांसाठी 298 कोटी रुपये, बँक ऑफ बडोदाच्या 3 हजार 102 खात्यांसाठी 47 कोटी रुपये, बँक ऑफ इंडियाच्या 7 हजार 183 खात्यांसाठी 80 कोटी रुपये, युनियन बँक ऑफ इंडियाच्या 6 हजार 170 खात्यांसाठी 76 कोटी रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकच्या 2 हजार 83 खात्यांसाठी 29 कोटी रुपये, युको बँकच्या 518 खात्यांसाठी 5 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकच्या 2 हजार 182 खात्यांसाठी 8 कोटी रुपये, कॅनरा बँकच्या 1 हजार 902 खात्यांसाठी 9 कोटी रुपये तसेच इंडियन बँकच्या 7 हजार 247 खात्यांसाठी 82 कोटी रुपयांची कर्जमाफी प्रस्तावित करण्यात आली आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन
वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.
या योजनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 48 हजार 869 शेतकरी पात्र ठरले असून त्यांना 244 कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 10 हजार 390 शेतकरी (51 कोटी), बँक ऑफ बडोदाचे 2 हजार 691 शेतकरी (43 कोटी), बँक ऑफ इंडियाचे 1 हजार 733 शेतकरी (14 कोटी), युनियन बँक ऑफ इंडियाचे 2 हजार 750 शेतकरी (13 कोटी), स्टेट बँक ऑफ इंडियाचे 11 हजार 677 शेतकरी (58 कोटी), बँक ऑफ महाराष्ट्रचे 9 हजार 482 शेतकरी (47 कोटी), महाराष्ट्र ग्रामीण बँकचे 1 हजार 488 शेतकरी (7 कोटी), युको बँकचे 411 शेतकरी (4 कोटी), पंजाब नॅशनल बँकचे 2 हजार 26 शेतकरी (25 कोटी), कॅनरा बँकचे 192 शेतकरी (2 कोटी) आणि इंडियन बँकचे 1 हजार 430 शेतकरी (11 कोटी) प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरले आहेत.
आधार प्रमाणीकरणानंतर थेट खात्यात रक्कम
कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले असून, सर्व बँकांना संबंधित माहिती पोर्टलवर तातडीने अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे.
ही योजना अमरावती जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणारी ठरणार असून, थकीत कर्जदारांसह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.











