
प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा “किनारे सरकत आहेत”गझलसंग्रह
अनंत काळापासून दारिद्र्यात खितपत पडून जीवन कंठणारा आणि प्रस्थापितांकडून सातत्याने अंगावर येणाऱ्या मानसिक यातना,व्यथा, वेदना, अपमान पुर्वापार सहन करीत आलेल्या पुर्वाश्रमीच्या दलित, वंचित समाजाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसात आणून बसविले, त्यांच्यात स्वाभिमान पेरण्यासोबतच दिशाहीन असलेल्या वंचितांना सुयोग्य दिशा देऊन त्यांच्या अंधाऱ्या काळ्याकुट्ट जीवनात प्रकाश निर्माण केला आणि त्यातून त्यांचे जीवनमान हळूहळू सुधारणेच्या दिशेने मार्गक्रमण करते झाले आणि मिळालेल्या संधीचे सोने करत वंचितांनी आपली वाटचाल केली व करीत आहेत.ज्याप्रमाणे निसर्ग नियमानुसार बदल हा अभिप्रेत असून त्याअनुषंगाने कोणतीही वस्तू मूळ स्वरूपात स्थावर राहत नाही.
परंतु कालांतराने सततच्या उन,पाऊस, थंडी आणि वारा इत्यादींच्या भडीमाराने तीचे मूळ स्वरूप बदलत राहते.अगदी त्याचप्रमाणे ॠतूमानानुसार दरवर्षी होणाऱ्या पर्जन्यसृष्टीमूळे नद्यांना पूर येतो आणि नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागते, त्यामुळे साहजिकच नदीचे किनारे म्हणजेच थड्या जलदगतीने प्रवाहित होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने खचून जातात अर्थात जागा बदलतात. अगदी त्याचप्रमाणे दलित , वंचितांनी प्रस्थापितांचे हादरे झेलत ,असह्य वेदना सहन करीत असतांनाही आपले जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले आणि करीत आहेत.आजही त्यादिशेने वंचितांचे प्रयत्न सुरू असणे म्हणजेच किनारे मुळ जागेवरून सरकत असल्याचे आशावादी चित्र दिसून येते.त्या अर्थाने किनारे सरकत आहेत याचे विश्लेषण करता येईल.साहित्याच्या क्षेत्राचा विचार केल्यास कवितेपासूनच गझलेची निर्मिती झाली असे अनेकांचे मत असून त्यामुळे गझल ही कवितेपासून साकारत आली असे वाटायला लागते.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
गझलकार नंदकिशोर दामोधरे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील व भातुकली तालुक्यातील वायगाव येथे झाला.त्यांना सामान्य माणसांच्या जगण्यातील व्यथा,दु:ख आणि वेदनांच्या तीव्रतेची जाणीव असल्याने त्यांच्या गझला सामाजिक जाणिवांनी ओतप्रोत भरलेल्या आहेत.त्यांचा प्रवास हा सामान्य माणसापासून ते शासनाच्या “पशुचिकित्सक अधिकारी”या वरीष्ठ पदापर्यंत झाल्याने तसेच त्यांचा स्वभावगुण सामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा असल्याने त्यांच्या गझलांना सामाजिक आशयाची भक्कम अशी किनार आणि अनुभवाची सक्षम जोड लाभली आहे.विशेष म्हणजे त्यांच्या अंगी असलेल्या गायनाच्या छंदाने त्यांना गझल निर्मितीकडे वळण्याची चालना मिळाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.त्यांनी त्यांच्या पहिल्याच ‘नको त्या वांझ विषयावर’या गझलमध्ये-
मला नाही तुला नाही निती असली बरी नाही,
तुझ्या माझ्या फुटीवरती निखारे पोसतो आम्ही,,
यावरुन त्यांनी समाजात असलेल्या फुटीरतेचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला, सोबतच एकिचे महत्त्व सुद्धा विशद केले.सामान्य जनांच्या व्यथा डोळ्यासमोर असतांना मजेने कसा राहू शकतो,हे मांडताना “आकांत भाकरीचा”या गझलेत ते म्हणतात-
“माझ्या सभोवताली आक्रोश भुकबळीचे,
पंक्तीत मग तुझ्या मी खाऊ कसा मजेने,,
पुढे,मी भारतीय असल्याचा अभिमान आणि आम्हाला संविधान सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगताना ते म्हणतात –
“मी भारतीय आहे इतकेच भान ठेवा,
माझ्या शवाबरोबर हे संविधान ठेवा,,
असतील रंग न्यारे आपापल्या घरावर, माझ्या घरी तिरंगा फडकत निशाण ठेवा,,
या गझलेत देशप्रेमासोबतच समता, बंधुत्वाची अपेक्षा देशवासीयांकडून करण्यात आली आहे.पुढे चळवळी संदर्भात खंत व्यक्त करतांना “आज आम्ही”या गझलेत ते म्हणतात “स्वाभिमानी एक नेता आज कोठेही दिसेना,
यामुळे तर पांगले झुंजार चेले चळवळीचे,,
गझलकार मुळात शेतकरी असल्याने त्यांच्या गझलेतून शेतकऱ्यांचे वास्तव चित्र कसे सुटेल? म्हणूनच ते “तूर सोयाबीन गेले”या गझलेत म्हणतात “निंदण्याचा खुरपणीचा खर्च झाला बेहिशोबी, शेतमजुरी मागणारे मग घरावर चाल झाले,,
गझलकार नंदकिशोर दामोधरे यांच्या गझलांवर चौफेर नजर टाकतांना असे दिसून येते की, त्यांच्या गझला माणसांच्या जगण्यातील विविध पैलूवर भाष्य करतांना समस्या आणि त्याचे निराकरण करण्यासाठी सुद्धा मार्गदर्शक ठरतात.अशाच आशयाची “संघर्ष भाकरीचा”ही गझल पोटासाठी भटकंती करणाऱ्या माणसांचे असह्य जगणे, त्यांच्या व्यथा, वेदना उजागर करणारी असून, वरवर पाहता आज भोवताली आभासी सुधारणांची मांदियाळी जरी दिसत असली तरी जगण्यासाठी संघर्ष अजूनही थांबला नाही हेच या गझलेत मांडताना”संघर्ष भाकरीचा सरला अजून नाही, दरिया समानतेचा भरला अजून नाही,,हे युद्ध भाकरीचे आहे युगायुगाचे, माणूस झुंजणारा हरला अजून नाही,,
भारताचे स्वातंत्र्य कशाने टिकणार,या बाबत गझलकार नंदकिशोर दामोधरे आपल्या”स्वातंत्र्य भारताचे “या गझलेत म्हणतात.
“देशात अर्धपोटी लाखो करोड जनता,मिळणार काय भाकर जयघोष बोलल्याने”
“कोठे समानतेचा आहे निवास हल्ली, जातोय जीव जेव्हा पाण्यास स्पर्शल्याने”
पुढे समाजाचे वर्तमानातील वास्तव मांडतांना”सारेच बोलबच्चन “या गझलेत गझलकार हताशपणे लिहितात की”सारेच बोलबच्चन देतात ज्ञान हल्ली,
वाह्यात बोलण्याने करतात घाण हल्ली,,चळवळ खरी कुणाची कळणे कठीण आहे,चमकोगिरी दिसावी मिरवून शान हल्ली,,मौनात राहणारे असतील खरे बिलंदर,दंग्यास एक कारण त्यांचेच कान हल्ली,,
गझलकार नंदकिशोर दामोधरे”नंदा”यांच्या “किनारे सरकत आहेत “या गझलसंग्रहामध्ये एकूण ९६ गझलांचा समावेश करण्यात आला असलातरी प्रत्येक गझल वेगवेगळ्या आशयाने परीपुर्ण असून त्या गझलांची अत्यंत प्रभावीपणे मांडणी केल्याने, एकूणच गझलांवर भाष्य करता येणे शक्य असतांनाही समिक्षा विस्ताराची व्याप्ती टाळणे उचित समजून निवडक गझलांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.गझलेच्या प्रांतातील बाराखडी अवगत नसतांनाही केवळ सोप्या भाषेतील गझलेची मांडणी असल्याने या गझलसंग्रहाची समीक्षा करतांना अनेक चुका होण्याची दाट शक्यता आहे,त्या मोठ्या मनाने सांभाळून घ्याव्यात अशी अपेक्षा आहे.
साहित्याच्या क्षेत्राचा विचार केल्यास कवितेपासूनच गझलेची निर्मिती झाली असे अनेकांचे मत असून त्यामुळे गझल ही कवितेपासून साकारत आली असे वाटायला लागते.नंदकिशोर दामोधरे “नंदा”यांच्या गझल संग्रहात एकूण ९६ गझलांचा समावेश असून त्या गझलांवर आंबेडकरवादी गझलेचे आद्य गझलकार वामनदादा कर्डक यांच्या गझलांचा प्रभाव दिसून येतो, हि नंदकिशोर दामोधरे यांच्या गझलसंग्रहाची भक्कम जमेची बाजू आहे. असे मी मानतो.सोबतच प्रसिद्ध गझलकार प्रमोद वाळके ‘युगंधर’यांची अत्यंत अभ्यासपूर्ण प्रस्तावना गझलसंग्रहाची साहित्यिक उंची वाढविणारी आहे.तसेच भाऊ दांदडे यांचे चित्तवेधक मुखपृष्ठ गझलसंग्रहाला साजेसे असेच आहे.
या गझलसंग्रहाच्या जमेच्या बाजू लक्षात घेता हा गझलसंग्रह गझलप्रेमी, कवी तथा गझलकार आणि वाचकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल अशी आशा आहे.सोबतच अत्यंत परखडपणे समाजाचे वास्तव आपल्या अभ्यासपूर्ण गझलेत मांडण्याचे कसब अंगिकारून आणि त्यातून समाज प्रबोधन करण्याची नंदकिशोर दामोधरे यांची दुर्दम्य इच्छाशक्ती या गझल संग्रहाच्या रूपाने दिसून आली, ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे.अशीच त्यांच्याकडून नवनवीन गझलांची निर्मिती व्हावी व त्यांनी गझलेच्या क्षेत्रात उंच भरारी घेऊन ज्येष्ठ आंबेडकरी गझलकार वामनदादा कर्डक यांच्या अपुर्ण राहिलेल्या स्वप्नांची पुर्तता करण्याचे त्यांचे प्रयत्न फलदायी होवोत.त्यांना भविष्यातील यशस्वी प्रवासासाठी मंगल कामनेसह मन:पुर्वक शुभेच्छा!
गझलसंग्रह:
किनारे सरकतआहेत
गझलकार: नंदकिशोर दामोधरे
प्रकाशक:-
डिऑन पब्लिशिंग हाऊस