वाशिम | प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातून वाहणाऱ्या कांचन नदीने रौद्ररूप धारण केले असून, अचानक आलेल्या पुरामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे रिसोड-कोयाळी मार्ग काही काळासाठी पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, तर नदीकाठावरील शेकडो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
राज्यात मान्सूनने उशिरा हजेरी लावली असली तरी आता पावसाने जोर धरला आहे. वाशिममध्ये सलग पडणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येत असून, कांचन नदीच्या पुरामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात पूर आला त्या परिसरात अतिवृष्टी झाली नव्हती. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी कांचन नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात आल्याने हा अचानक पूर आला.
पुराच्या तीव्र प्रवाहामुळे नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये पाणी घुसले. अनेक ठिकाणी सुपीक माती वाहून गेली, तर काही शेतांच्या बांधांना तडे गेले आहेत. ऐन पेरणीच्या हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून कांचन नदीला वारंवार पूर येत असून नदीचे खोलीकरण आणि पात्राची सुधारणा करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, प्रशासनाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
वारंवार होणाऱ्या पूरस्थितीमुळे शेती, रस्ते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नदीचे खोलीकरण, तटबंदी आणि कायमस्वरूपी पूरनियंत्रण उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे.








