Saturday, June 20

प्रा. बी. टी. देशमुख यांचे निधन : विदर्भ विकासाचा ज्ञानसूर्य अस्तंगत.!

प्रा. बी. टी. देशमुख यांचे छायाचित्र – विदर्भ विकासाचे शिल्पकार आणि शिक्षकांचे कैवारी

प्रा. बी. टी. देशमुख यांचे निधन : विदर्भ विकासाचा ज्ञानसूर्य अस्तंगत.!


राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, अभ्यासू आमदार, शिक्षकांचे कैवारी आणि तहानलेल्या विदर्भाला समृद्ध व जलसंपन्न करणारे भगीरथ, प्रा.बी. टी. देशमुख यांचे 19जूनच्या सायंकाळी अखेर दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील संपूर्ण शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे.


​बेलोरासारख्या ग्रामीण भागातून अमरावतीच्या शैक्षणिक भूमीत येऊन त्यांनी आपल्या ज्ञानाची व कर्तुत्वाची बीजे रोवली. ‘दैनिक हिंदुस्तान’ हे त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीचे कार्यक्षेत्र होते. पत्रमहर्षी बाळासाहेब मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली ते पत्रकारिकेत घडलेत . हिंदुस्तान कार्यालयाला आपले मानून तेथे त्यांनी पडेल ते काम स्वीकारले आणि आपली कार्यक्षमता सिद्ध केली. म्हणूनच बाळासाहेब मराठे त्यांना आपला ज्येष्ठ पुत्र मानू लागले होते.


​कठोर परिश्रम करून व स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत ते शासकीय विदर्भ महाविद्यालयात कला शाखेत दाखल झाले. तेथे त्यांनी विद्यार्थी नेतृत्वाला सुरुवात केली आणि अल्पावधीतच ते विद्यार्थ्यांचे लाडके नेते झाले. छात्रसंघाच्या निवडणुकांमध्ये, महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी ते सातत्याने लढत राहिले. विद्यार्थी त्यांना ‘बीटी भाऊ’ म्हणू लागले आणि पुढे ते सर्वांचेच लाडके ‘बीटी भाऊ’ झाले. विदर्भ महाविद्यालयात त्यांच्याच प्रयत्नाने अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले, प्रामुख्याने इंग्रजी विषयातील स्नातकोत्तर अभ्यासक्रम त्यांच्याच प्रयत्नाची फलश्रुती होय. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अमूल्य लाभ झाला. १९७३ मध्ये संपन्न झालेल्या शासकीय विदर्भ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव प्रसंगी भाऊंनी महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधांची मागणी राजकीय नेत्यांसमोर जोमाने रेटली आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. मुलींसाठीचे अतिरिक्त वसतिगृह हे त्यांच्याच अथक प्रयत्नांचे फळ होय.


शासकीय ​विदर्भ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा.प . सि. काणे हे त्यांच्या गुरुस्थानी होते. प्राचार्यांच्या बंगल्यावर बीटी भाऊ आणि प्रा.काणे सर सायंकाळच्या वेळी अनेकदा चर्चा करताना मी पाहिले आहे . गुरू आणि शिष्याचा असा अनोखा अनुबंध त्यावेळी मी स्वतः अनुभवला.

शिस्त आणि वक्तशीरपणा बिटी भाऊंच्याठायी ठायी दिसून येत होता अमरावतीच्या श्री शिवाजी श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक असताना ते अगदी वेळेवर वर्गात प्रवेश करत आणि अध्यापनाच्या वेळी सलग दोन तास जरी अध्यापन करत राहिले तरीसुद्धा वेळ कळत नव्हती तरीसुद्धा त्यांच्या वक्तशीरपणावर अनेक लोक अनेक लोक आपल्या मनगटी घड्याळात वेड लावत असत अशीही त्यांच्या बाबतची आख्यायिका आहे.


​अमरावती शहराच्या पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या बीटी भाऊंना नेहमी भेडसावत असे. ‘दैनिक हिंदुस्तान’मधून ते या समस्यांवर सातत्याने लिखाण करत असत. अखेरीस शासकीय विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातच पाणीपुरवठा विभागाला आवश्यक असलेली जागा देऊन, तत्कालीन गव्हर्नर सुब्रमण्यम यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा विभागाचे दिमाखात उद्घाटन झाले आणि त्याच ठिकाणी एक महाकाय पाण्याची टाकी बांधण्यात आली. अप्पर वर्धा धरणाचे पाणी आज अमरावतीकरांना अखंड लाभ देत आहे, यात भाऊंचा मोठा वाटा आहे.


​संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची मागणी शासन दरबारी सातत्याने लावण्यात बीटी भाऊंचा सिंहाचा वाटा होता. त्याचीच फलश्रुती म्हणून अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली आणि बुलढाणा, अकोला, यवतमाळ व वाशीमसारख्या दुर्गम जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना नागपूरसाठी करावी लागणारी पायपीट थांबली.
​राज्यशास्त्र विषयावर त्यांनी अनेक क्रमिक पुस्तके लिहिली. ही ग्रंथसंपदा सुबोध व सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही सहज समजण्यासारखी आहे. विद्यापीठ अंतर्गत त्यांनी वेळोवेळी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. विदर्भाच्या आणि अमरावती विद्यापीठाच्या विकासासाठी ते अहोरात्र झटले. त्यांच्या या प्रयत्नांची फळे आज सर्व स्तरातील विद्यार्थी आणि शिक्षक चाखत आहेत.


​बीटी भाऊ सलग ३० वर्षे शिक्षक आमदार राहिले. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी अहोरात्र शिक्षकांच्या कल्याणाचा ध्यास घेतला. १९७६ मध्ये त्यांनी ‘नुटा’ (NUTA) या संघटनेचा श्रीगणेशा केला आणि त्या माध्यमातून प्राध्यापकांच्या पूर्वापार चालत आलेल्या अनेक समस्यांचा निपटारा केला. त्यांनी प्राध्यापकांना समाजामध्ये सर्वोच्च स्थान मिळवून दिले. आज वेतनमानाचा विचार केल्यास, जिल्हाधिकाऱ्यांपेक्षाही अधिक वेतन अनेक प्राध्यापक घेत आहेत, याचे सर्वस्वी श्रेय बीटी भाऊंनाच जाते.
​दिनांक २१ जून रोजी ‘नुटा’ संघटनेचा सुवर्णमहोत्सव सोहळा आयोजित केला आहे. मात्र, या सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच बीटी भाऊंनी स्वर्गारोहण केले, याचे निश्चितच मनाला प्रचंड वाईट वाटते. परंतु, त्यांनी संघर्षाची जी ज्योत पेटवून ठेवली आहे, तिचा उजेड कधीही मंदावणार नाही, असा पूर्ण विश्वास वाटतो.
​शेवटी मी एवढेच म्हणेन–
“उजाले आपके यादों के हमारे साथ रहने दो, न जाने जिंदगी की कब शाम हो जाये…”

​– प्रा. डॉ. राजेंद्र भुयार

​– प्रा. डॉ. राजेंद्र भुयार

फ्रेंड्स कॉलनी वि. म. वी. रोड अमरावती
मोबाईल: 9503046555

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.