अमरावती प्रतिनिधी: जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे भासवून काही भामट्यांनी 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची तब्बल 8 एकर शेती स्वतःच्या नावावर करून घेतल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणोरी येथील रहिवासी नंदकिशोर रामप्रसाद शर्मा यांना घराची पुनर्बांधणी करायची होती. त्यासाठी शेती मॉर्गेज ठेवून बँकेतून कर्ज घेण्याचा त्यांचा विचार होता. याच दरम्यान एका ओळखीच्या व्यक्तीने काही “बँकेचे दलाल” ओळखीचे असल्याचे सांगत त्यांची आरोपींसोबत भेट घडवून आणली.
आरोपींनी स्वतःला बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे सांगून वृद्ध शेतकऱ्याचा विश्वास जिंकला. शेती मॉर्गेजसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करावी लागतील, असे सांगत त्यांनी शर्मा यांच्याकडून महत्त्वाचे दस्तावेज घेतले.
शर्मा हे अशिक्षित असल्याचा फायदा घेत आरोपींनी मॉर्गेजचे कागद तयार करण्याऐवजी थेट त्यांच्या मालकीची गणोरी आणि शिपगाव येथील सुमारे 8 एकर शेती स्वतःच्या नावावर करून घेतली. एवढेच नाही तर खोटी इसारचिठ्ठी आणि बनावट खरेदीखत तयार करून संपूर्ण व्यवहार पूर्ण करण्यात आल्याचा आरोप आहे.
फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर नंदकिशोर शर्मा यांनी भातकुली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी अशोक राधेश्याम जोशी, श्रीनिवास राजेंद्र जोशी, सारासिंह मनोहरसिंह चव्हाण, वराह राजेंद्र जोशी, संतोष मिश्रा आणि अनिल चौधरी या सहा आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी संपूर्ण माहिती तपासून घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.









