Wednesday, April 22

आमची शक्ती-आमचा ग्रह

प्लास्टिक प्रदूषण आणि पर्यावरणाचा समतोल

आपण ज्या ग्रहावर जन्म घेतला तोच आपला ग्रह, आणि तो ग्रह म्हणजे पृथ्वी.म्हणजे पृथ्वी हा ग्रहच आपले निवासस्थान आहे असे आपण हक्काने म्हणू शकतो.
आपण ज्या घरी राहतो ते घर आपण जर स्वच्छ ठेवले नाही तर त्याचे काय परिणाम होतात हे सूज्ञास सांगणे न लगे. तदवतच आपण ज्या जागेवर घर करुन राहतो त्यालगतचेही घर स्वच्छ टापटीप असावे नव्हे तर संपूर्ण परिसरच टापटीप म्हणजे स्वच्छ असावा,अगदी प्रदुषणमुक्त असावा असे प्रत्येकास वाटावयास पाहिजे. आपल्या घराभोवताल हिरवळ असावी जेणेकरुन स्वच्छ प्राणवायु आपल्या नासिकेत प्रवेश करु शकेल. झाडे किंवा वनस्पतीच्या प्रत्येक प्रजाती ह्या जैवसाखळीकरिता आवश्यक घटक आहेत.


त्या तर आपण जपल्याच पाहिजेत. ते आपले प्रथम कर्तव्यच ठरते.पर्यावरणाचा समतोल साधण्यास वृक्षारोपनाशिवाय दुसरा पर्याय नाही. पर्यावरणाचा समतोल बिघडला तो मानवनिर्मित सुखोपयोगी साधनामुळे. दोन चार चाकी वाहनांची संख्या भरमसाठ वाढल्यामुळे ध्वनी व वायुप्रदुषणात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. यानेच मानवाचे जगणे असह्य झाले आहे. श्वसन व इतरही आजारासही हे वायुप्रदुषणच कारणीभूत आहे. विकासाची कास धरताना यावर मात करण्याच्या उपाययोजना करण्यास मानव कमी पडला आहे, त्यामुळे हे भोग आता त्याच्या नशिबीच लागलेले आहे.


हे ध्वनी वायु प्रदुषणाच्या बरोबरीला आले आहे ते म्हणजे प्लास्टिक प्रदूषण. प्लास्टिकचा हा भस्मासूर एवढा प्रचंड प्रमाणात वाढला आहे की तो पृथ्वीला गिळंकृत करावयास निघाला आहे. आपल्या पृथ्वीवर अनेक राज्यातील शहरात अत्र तत्र सर्वत्र प्लास्टीकचा सडा पडलेला आढळतो. त्याने शेतीतही शिरकाव केलेला आहे. प्लास्टीकचे विघटन व्हायला शेकडो वर्षे लागतात, मातीत त्याचे विघटन होतांना त्यातील सूक्ष्मकण अन्नाद्वारे मानव व इतरही जलचर, उभयचर प्राण्यांच्या पोटात जावून कॅन्सरसारखे अतिशय दुर्धर आजार त्यांच्या नशिबी येत आहेत.प्लास्टिकचे सूक्ष्मकण पाण्यात मिसळून जलप्रदुषण सुद्धा होत आहे. काही दिवसाने जमिनीतील पाणीही पियायोग्य असेल काय याची भिती निर्माण झालेली आहे.


म्हणून प्लास्टिक वापरणे पूर्णत: बंद होणे आवश्यक आहे. शासनकर्त्या जमातीने ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.पण भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेली आजची राजसत्ता जमात प्लास्टिक कारखान्यांना परवानेच्या परवाने देत सुटली आहे.विकसाची कास धरतांना वसुंधरा भकास होऊ नये याचेही भान ठेवणे आवश्यक आहे.
एका पिढीने फेकलेल्या प्लास्टीकचे परीणाम दोन तीन पिढ्यांना भोगावे लागते अन हे चक्र असेच चालू राहिल्यास सृष्टीचा विनाश अटळ आहे.
रस्ते बांधकामात काँक्रीटच्या वापरामुळे शहराशहरात उष्णपट्टे निर्माण होत आहेत. वाहनाच्या घर्षणाने प्रचंड उष्णता बाहेर फेकल्या जाते, उन्हाळ्यात तर हे रस्ते प्रचंड प्रमाणात तापून तापमान वाढण्यास कारणीभूत ठरतात.


त्यामानाने हरीतपट्टे शहरात किंवा मानवी वस्तीस दृष्टीस येत नाही. या उष्णपट्ट़यांच्या उष्णतेची तीव्रता कमी करण्यास शहरात, गावोगावी, माळरानवर वृक्षारोपण करुन जास्तीत जास्त हरीतपट्टे निर्माण करणे आवश्यक आहे.


आपला ग्रह प्रदुषणाच्या विळख्यात सापडू न देणे हे सर्वस्वी मानवाच्याच हातात.म्हणून वाढते प्रदुषण व वृक्ष संवर्धनासाठी प्रत्येकाने सतत प्रयत्नशील व कृतीशील असणे गरजेचेच आहे. याकरिता आपल्याकडून प्रथम कृती म्हणजे प्लास्टिकचा वापर बंद करणे व वृक्षरोपन करुन त्याचे संवर्धन करणे ही होय.
वसुंधरा वाचली तरच मानव वाचेल हे लक्षात घ्या. आपण वाचलो पण पुढच्या पिढीचे काय हा ही विचार मनात येऊ द्या.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.