• Wed. Jun 7th, 2023

संविधानातील मूल्यांविषयी जाणीवजागृती व्हावी -प्र. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे

    * अमरावतीत ‘समता पर्व’चा उत्साहात शुभारंभ
    * 201 जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण
    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचे व त्याचबरोबर सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक अधिकार घटनेमुळे प्रत्येकाला मिळाले आहेत. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता भारतीय संविधानाने दिलेली आहे. संविधानातील या मानवी मूल्यांचा जागर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी संविधानाबाबत जाणीवजागृती करावी, असे आवाहन प्र. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी आज केले.

    येथील सामाजिक न्याय भवनात संविधान दिनानिमित्त समता पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, सहायक आयुक्त माया केदार, व्याख्येते प्रा. डॉ. राजेश मिरगे आदी यावेळी उपस्थित होते.

    आमदार सुलभाताई खोडके यांनी सामाजिक न्याय विभागाद्वारे आयोजित ‘समता पर्व’ उपक्रमास तसेच संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

    श्री. व्यवहारे म्हणाले की, स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीला अधिकार बहाल करणाऱ्या राज्यघटनेचा 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण स्विकार केला. भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगिकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रतीही अर्पण केलेली आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला मुलभूत अधिकार बहाल केले आहेत. लोकशाही गणराज्यात संविधान राबविण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. हा राष्ट्रीय ग्रंथ असून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय संविधान महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

    संविधानातील ‘सार्वभौम भारत’ ही संकल्पना प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. संविधानाने बहाल केलेले मुलभूत अधिकारासह मुलभूत कर्तव्यसुध्दा प्रत्येकाने जबाबदारीपूर्वक पार पाडले पाहिजेत. उद्याचा सक्षम भारत घडविण्यासाठी घटनेतील स्वातंत्र्य, समता व बंधूता या घटकांचा प्रत्येकाने अंगिकार व प्रसार केला पाहिजे. भारतीय संविधानाचा सार उद्देशिकेत दिला असून उद्देशिकेचे वाचन व त्याचा अर्थ प्रत्येकाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. राजकीय लोकशाहीचे परिवर्तन सामाजिक लोकशाहीत झाल्यावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित राज्य घटनेचा हेतू सफल होईल, असे प्रा. डॉ. मिरगे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.

    विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी मंडणगड पॅटर्न राज्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्रातच जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती तसेच मागासवर्गीयांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी सामाजिक न्याय विभागाकडून योजनांचा लाभ तसेच समतादूताव्दारे योजनांचा प्रचार-प्रसार केला जातो. स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांसाठी बार्टीकडून पूर्व प्रशिक्षण योजनांचा लाभ दिला जातो. मागासवर्गीयांच्या सर्वांगिण विकासासाठी भारतीय संविधानात विविध कलमान्वये अधिकार अधिसूचित करण्यात आले आहे, अशी माहिती उपायुक्त श्रीमती राऊत यांनी यावेळी दिली.

    संविधान दिनाच्या आयोजनाबाबतचा उद्देश, समता पर्व उपक्रम यासंदर्भात श्री. वारे यांनी सांगितले. ते म्हणाले, भारतीय संविधान व त्याचे महत्व अधोरेखित होण्यासाठी आणि त्यातील विविध कलमांची माहिती सामान्यांना होण्यासाठी संविधान दिन राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येतो. सामान्य मानसाला केंद्रस्थानी ठेवून राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली आहे. समाजातील सर्वच घटकांना समान न्याय व अधिकार भारतीय संविधानच्या माध्यमातून प्राप्त झाले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी संविधान दिनानिमित्त जिल्ह्यातील 201 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात प्रांरभी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर श्री. जाधवर यांनी आभार मानले.

    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *