मलेरिया हा एक घातक आजार असून वेळेत आणि योग्य उपचार मिळाले नाहीत तर रुग्णाच्या जिवाला धोका पोहोचू शकतो. महत्त्वाचं म्हणजे यावरील उपचार खर्चिक, त्रासदायक असल्याने रुग्णाला बराच त्रास सहन करावा लागतो. मात्र मध्यंतरीच शास्त्रज्ञांनी एसजी ७३३ नावाचं औषध शोधलं असून त्यामुळे मलेरियाची लागण झालेल्या रक्तातल्या पेशी मरतात पण इतर निरोगी पेशींचं कोणतंही नुकसान होत नसल्याचं समोर आलं आहे. या औषधातल्या गुणधर्मांमुळे शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती नव्या जोमानं काम करू लागते आणि रोगाचा समूळ नायनाट होतो. उंदरांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर उंदरांचा मलेरिया दोन दिवसात बरा झाला. या रोगाच्या विषाणूंमध्ये मलेरियाच्या औषधांना प्रतिकार करण्याची क्षमता विकसित झाली आहे. त्यामुळे अनेक जुनी औषधं निरूपयोगी ठरत आहेत. या धर्तीवर फक्त एक डोस घेतल्यानंतर मलेरिया बरा करणारं औषध शोधून काढणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. त्यांना हे औषध परवडणार्या किंमतीत उपलब्ध करून द्यायचं होतं. आता यासंबंधीच्या पुढील चाचण्या सुरू आहेत.