एका शूरवीर राजाचं साम्राज्य खूप दूरपर्यंत पसरलेलं होतं. अपार संपत्तीने त्याचा खजिना सतत भरलेला असायचा. हे सगळं चांगलं असलं तरी राजाचे सल्लागार मात्र चांगले नव्हते. ते कायम राजाच्या अहंकाराला प्रोत्साहन द्यायचे. एकदा राजाच्या दरबारात एक तेजपुंज साधू आला. राजाला पाहताच त्याने ओळखलं की याला खूप गर्व झाला आहे. राजाने मोठय़ा तोर्यात विचारलं, ‘तुला काय पाहिजे?’ साधू म्हणाला,’राजन, मला तुझ्याकडून काहीच नको आहे. उलट मीच तुला काही देण्यास आलो आहे.’ राजाचा अहंकार दुखावला गेला आणि तो मोठय़ाने ओरडला,’लहान तोंडी मोठा घास घेतोस. लाज वाटते का नाही. तुझ्याजवळ फुटक कवडी नाही अन् तू मला काय देणार?’ साधू हलकेच हसत म्हणाला,’राजन, त्यागाशिवाय भोगाला चव नाही. वैभवात त्याग समाविष्ट होतो तेव्हाच तो वंदनीय आणि प्रशंसनीय ठरतो. त्यागामुळे अहंकार दूर होतो, आसक्त दूर होते आणि मन परमात्म्याकडे पोहोचण्यासाठी तयार होते.’ फकिराच्या बोलण्याने राजा खजील झाला. त्याचं गर्वहरण झालं.
तात्पर्य – अहंकारी माणसाचं कधीना कधी गर्वहरण होतंच.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023