
“येवल्यात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा: अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड”

गौरव प्रकाशन येवला, (प्रतिनिधी) : येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय चौथ्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, तर उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ यांनी पत्रकाद्वारे दिली.
४ जून २०२५ रोजी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रभरातील निवडक साहित्यिकांच्या साहित्य कलाकृतींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार १ मे रोजी जाहीर करण्यात आले होते.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
अध्यक्षपदासाठी निवड झालेल्या डॉ. माहेश्वरी गावित या सध्या अहिल्यानगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत. त्या आदिवासी साहित्य, लोकसाहित्य व आदिवासी भाषेच्या अभ्यासक, समीक्षक असून २०१५ मध्ये नांदेड येथे झालेल्या अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांनी आदिवासी जीवनावर आधारित ‘महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य : एक शोध’, ‘आदिवासी साहित्य विचार’, ‘लोकसाहित्य : जीवनकला’ अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
उद्घाटकपदाची जबाबदारी घेणारे डॉ. कैलास दौंड हे पाथर्डी (अहिल्यानगर) येथील साहित्यिक असून त्यांच्या ६ कवितासंग्रह, ३ कादंबऱ्या, १ कथासंग्रह, १ ललित लेखसंग्रह आणि ४ बालसाहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या ‘गोधडी’ या कथेला महाराष्ट्राच्या इ. ८ वीच्या पाठ्यपुस्तकात स्थान मिळाले असून ‘कापूसकाळ’ ही कादंबरी मुंबई विद्यापीठ व रुईया महाविद्यालयाच्या बी.ए. अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या दोन्ही मान्यवरांच्या निवडीचे साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार सोहळा साहित्यिक वाचकांसाठी एक मोठा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे.