![](https://www.gauravprakashan.com/wp-content/uploads/2024/03/5.jpg)
मोर्शी येथे ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलनाचे आयोजन
१९ मार्च रोजी हजारो शेतकरी होणार ‘अन्नत्याग’ आंदोलनात सहभागी !
मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : गेली ३७ वर्ष राज्यातला शेतकरी रोज मृत्यूला कवटाळत आहे. सरकारे बदलली, पण शेतकऱ्यांचे दुःख कमी झालेले नाही. याचा निषेध म्हणून मोर्शी येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी क्रूरपणे, विरोधीपक्ष बेजबाबदारपणे तर प्रसारमाध्यमे गाफीलपणे शेतकरी आत्महत्यांची उपेक्षा करीत आहेत. याबद्दल किसानपुत्रांमध्ये रोष असून येत्या १९ मार्च रोजी महाराष्ट्रभर ‘अन्नत्याग’ उपवास केला जाणार असल्याची माहिती मोर्शी तालुका किसानपुत्र समितीने दिली.
शेतकऱ्यांंविषयी सहवेदना व्यक्त करण्यासोबत त्यांच्या विषयीची बांधिलकी बळकट करण्यासाठी तसेच ज्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या धोरणांचा निषेध करण्यासासाठी मोर्शी येथे १९ मार्च रोजी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण गावचे शेतकरी साहेबराव करपे यांनी शेती परवडत नाही म्हणून पत्नी, मुलांसह आत्महत्या केली. ती महाराष्ट्रातील पहिली आत्महत्या होती. त्यानंतर आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या आजही सुरूच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी, समाजातील घटकांनासुद्धा याची जाणीव व्हावी, या उद्देशाने समाजातील सर्वच नागरिकांना शेतकऱ्यांप्रती एक दिवस अन्नत्याग उपोषण करावे लागत आहे.
अन्नत्याग आंदोलनामध्ये १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांनी सहभागी व्हावे. समाजप्रबोधन व्हावे, या उद्देशाने रामजिबाबा चौक मोर्शी येथे सर्वच संघटनांना व सर्वपक्षीयांना घेऊन एक दिवसाचे अन्नत्याग उपोषण करण्यात येणार आहे. आपल्या शेतकऱ्यां प्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचा उपवास ठेवून याच्यामध्ये जात, धर्म, पंथ, या कक्षाच्या पलीकडे जाऊन कुठल्याही विषयाला थारा दिल्या गेल्या नाही त्यामुळे या शेतकरी हिताच्या आंदोलनामध्ये सर्वच समाजाने आपला सहभाग नोंदवावा व आपली कृतज्ञता शेतकऱ्या प्रति व्यक्त करावी ज्यांना शक्य असेल त्यांनी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन किसान पुत्रांनी यावेळी केले.
——————-
अवघा समाज शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे. अन्नत्याग आंदोलनातील सर्वसामान्यांचा सहभाग हे त्याचेच प्रतीक आहे, मात्र शेतकऱ्यांनी हताश होऊन आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये. त्यामुळे समस्या सुटणार नाही. सरकारनेही मानसिक खच्चीकरण होणार नाही व शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये यासाठी शासनाने तयार केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करून तात्काळ उपाय योजना करणे गरजेचे आहे
![](https://www.gauravprakashan.com/wp-content/uploads/2024/03/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-1-1-1-1-1-1-300x300.jpg)
-रुपेश वाळके, ग्राम पंचायत सदस्य.
——————-
मेक इन महाराष्ट्र, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, गॅरंटी, अशा राजकीय घोषणा रोज कानावर पडत असतांना महाराष्ट्रात सरासरी दहा शेतकरी दररोज आत्महत्या करतात. त्याची मात्र चर्चा कुठेच होत नाही. शेतकऱ्यांच्या न बदललेल्या विदारकतेकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही १९ मार्च रोजी हजारो शेतकरी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलन करणार आहे.
![](https://www.gauravprakashan.com/wp-content/uploads/2024/03/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80-266x300.jpg)
-संदीप रोडे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मोर्शी.