
गौरव प्रकाशन अमरावती | प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असताना मान्सूनची प्रगती पुन्हा एकदा मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. हवामान अभ्यासक प्रा. अनिल म. बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सध्या हरनई, सोलापूर आणि हैदराबाद परिसरातच थांबलेला असून त्या भागातही समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र, २३ जूननंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता असून मान्सूनला पुन्हा गती मिळू शकते, असे संकेत मिळत आहेत.
विदर्भात उष्णतेची लाट कायम
२४ जूनपर्यंत अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. यवतमाळसह पूर्व विदर्भातील काही भागांत हलक्या सरींची शक्यता असली तरी उष्णतेची लाट कायम राहू शकते.
हवामान तज्ज्ञांच्या मते, २५ जूननंतर पावसाच्या हालचालींना चालना मिळण्याची शक्यता असून काही भागांत चांगल्या पावसाची सुरुवात होऊ शकते.

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी
सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी पेरणी करू नये, असा महत्त्वाचा सल्ला प्रा. बंड यांनी दिला आहे. धुळपेरणी टाळण्याचे आवाहन करत त्यांनी फळबागांना आवश्यक तेवढेच हलके ओलीत सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
तसेच शेतातील काडीकचरा किंवा धुरे जाळण्याऐवजी तो जमिनीतच ठेवावा, त्यामुळे ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. पडणारे पावसाचे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरेल यासाठी नियोजन करावे. सरी-वरंबा पद्धतीने पेरणी करणे, तसेच सेंद्रिय खत व शेणखताचा वापर वाढवणे फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एल निनोचा वाढता प्रभाव चिंताजनक
यंदा एल निनोचा प्रभाव मान्सूनवर स्पष्टपणे दिसून येत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे २०२६ हे वर्ष दुष्काळाच्या छायेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या एल निनोची सुरुवात झाली असून त्याची तीव्रता पुढील काही महिन्यांत वाढू शकते.
दरम्यान, २३ जूननंतर मेडन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) अनुकूल होण्याची शक्यता असल्याने २५ जूनपासून पावसाला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
सौजन्य : भारतीय हवामान विभाग (IMD) व हवामान अभ्यासक प्रा. अनिल म. बंड













