नागपूर : देशातील प्रत्येक नागरिकाला परवडणारी आणि सहज उपलब्ध असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी आमचे प्रयत्न असून आज महामार्ग-रस्त्यांचे सर्वाधिक लांबीचे जाळे असलेला आपला देश दुसर्या क्रमांकावर असल्याची माहिती केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
‘केपीआयटी स्पार्कल २0२१’ च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या पदाधिकार्यांशी ई संवाद साधताना गडकरी म्हणाले, रस्ते-महामार्गाचे जाळे वाढत असताना तरुण अभियंत्यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आवश्यकता आहे. कार्यक्षम, परवडणारी आणि जलद वाहतूक व्यवस्थेसाठी तरुण अभियंत्यांची मदत, कल्पना मोलाची ठरणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे आवश्यक असून शहरातील प्रत्येक भागात सेवा देऊ शकेल अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची आपल्याला गरज आहे, असेही ते म्हणाले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता सिटी बस, टॅक्सी, ऑटो, दुचाकी आता इलेक्ट्रिक इंधनावर चालणारी पाहिजे. पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून जैविक इंधनाचा वापर आवश्यक आहे. जैविक इंधन, ई व्हेईकल यामुळे पेट्रोल डिझेल आयातीच्या खर्चात मोठय़ा प्रमाणात बचत होणार आहे. सोबतच पर्यावरणाचे रक्षण करणेही शक्य होईल. बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. सोडियम आयन, अँल्युमिनियम, झिंक आयन व हायड्रोजन पासून निर्माण होणार्या इंधनावर संशोधन सुरु आहे. भविष्यात वाहतुकीसाठी या इंधनाचा वापर करावा लागणार असल्याचेही ते म्हणाले.
Related Stories
April 26, 2024