मुंबई : राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या अंतिम टप्प्यात भाजपाने धक्कातंत्राचा अवलंब केला. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लावण्यात आली. गुरुवारी सायंकाळी राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला.
आता महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष संपल्याची चिन्हे दिसत आहेत. शिदे आणि फडणवीस सरकार स्थापन होऊन अद्याप २४ तासही उलटले नाहीत, तोपर्यंत हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षालाही माहीत आहे, की हा प्रासंगिक करार आहे. हे सरकार किती दिवस टिकणार आणि २0२४ साली ते पुन्हा निवडून येतील किंवा नाही, याबाबत शंका आहे. मला तर वाटतंय २0२४ आधीच निवडणुका होतील, त्यावेळी हे सगळे निवडून येतील किंवा नाही, याची चांगली माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना देखील आहे. त्यामुळे यांच्यावर किती अवलंबून राहायचं हे, भारतीय जनता पक्ष ठरवेल, असेही पाटील म्हणाले.