‘तारूण्य पीटिका’ या नावावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांचा तारुण्याशी संबंध आहे. १४-१५ वर्षांच्या मुला मुलींना तारुण्यपीटिका येतात. काही जणांना त्या कायम होतच राहतात. तारुण्यपीटिका म्हणजेच त्वचेवर येणारे फोड. ते चेहर्यावर वा शरीरावर इतरत्र कुठेही येऊ शकतात. त्वचेत काही तैलग्रंथी असतात. त्यातील स्त्रावामुळे त्वचा स्निग्ध राहते. त्यांची रंध्रे बंद झाल्यास त्यातील स्त्राव गोळा होतो व फोड येतात. नंतर जंतुसंसर्गही होतो. या फोडांना तारुण्यपीटिका असे म्हणतात.
तारूण्य पीटिका येण्याची अनेक कारणे आहेत. पौगंडावस्थेमध्ये शरीरातील संप्रेरकांच्या (हार्मोन्सच्या) प्रमाणात होणारे बदल, त्वचेची नीट निगा न राखणे, दीर्घ मुदतीचे आजार, कुपोषण, आहारात मेदयुक्त पदार्थांचा जास्त समावेश, बद्धकोष्ठ, तसेच मानसिक ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे तारूण्य पटीका होतात. साहजिकच तारुण्यपीटिका उपचारासाठी वरील कारणांवर आधारित अनंत उपाय उपलब्ध आहेत. पण एक लक्षात ठेवायला हवे ते म्हणजे शारीरिक अनारोग्याचे व एक वरवरचे लक्षण म्हणजे तारूण्य पीटिका. निरोगी, सुदृढ, मानसिक व शारीरिक दृष्ट्या व्यक्तीला त्याचा त्रास होत नाही. चिंता करण्याने तारुण्यपीटिका अधिकच वाढतात. शारीरिक स्वच्छता, समतोल आहार, जेवणाच्या वेळा, विश्रांती, झोपेच्या वेळा यात नियमितपणा व्यायाम आदी आरोग्यपूर्ण सवयीचा अंगीकार केल्यास या त्रासापासून आपली मुक्तता होऊ शकेल.