महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेला कवितासंग्रह “भूक छळते तेव्हा…” हे पुस्तक काल हाती पडले. म्हणजे कवी संदीप राठोड यांनी आठवणीने पाठवले. कविता वाचून मी भारावून गेलो. काही कविता वाचताना डोळ्यांत आसवं आली. खरंच कवी संदीप राठोड यांनी त्यांच्या आणि तमाम तांड्याच्या व्यथा,वेदना आपल्या संवेदनशील मनाने कवितेतून प्रचंड ताकदीने मांडलेल्या आहेत.
१०० कविता लिहूनही एखादा कवी प्रसिद्ध होत नाही. परंतु गोर कवी संदीप राठोड यांची ‘भूक छळते तेव्हा…’ ही एकच कविता प्रचंड गाजलेली आहे. व ती शंभर कवितेची बरोबरी करणारी आहे. आज महाराष्ट्रामध्ये फेसबुक असो की, व्हाट्सअप सगळीकडे ‘भूक छळते तेव्हा…’ याच कवितेचा सर्वत्र बोलबाला दिसत आहे. कालच फेसबुकवर ही कविता ऐकताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बघितलं. आणि या पुस्तकावरील समीक्षा करण्यासाठी मला मोह आवरता आला नाही. गोरबंजारा समाजामध्ये जी साहित्य चळवळ फोफावत आहे. त्याचे सर्व श्रेय आदरणीय भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेब आणि प्रा. मोतीराज राठोड सरांना जाते.
गोरबंजारा समाजातील अनेक लेखक, कवी घडवण्याचे काम त्यांनी केले असून गोरबंजारा साहित्य संमेलन घेऊन त्यांनी गोर साहित्य चळवळ ही गावोगावी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवली.या साहित्य चळवळीच्या माध्यमातून अनेक कवी, लेखक गोरबंजारा समाजामध्ये लिहिती झाली. आणि आज लिहित आहेत. गोरबंजारा समाजामध्ये अनेक कवींचे कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले असून सौ. प्रमिलाताई राठोडचे नवे अंकुर, सौ.शशिकला चव्हाणचे बंधमुक्ता, रामकुमार चव्हाणचे काटेरी पुष्प, राजाराम जाधव सरांचे वादळवारा, डॉ. प्रभंजन चव्हाण यांचे ऊर्जेची स्वगते, लखनकुमार जाधवांची जागली, प्रसिद्ध कवी श्रीकांत पवार यांचे कायीं कुं गोरूर साकी, विनायक पवारांचे नामुष्कीचे पिढीजात वर्तमान, कैलास पवारांचे आरसा, प्रताप राठोड यांचे आसेवरी जगावे, कवि रतन आडेचे गोरधून, डॉक्टर चंदू पवार यांचे मरणासन्न हयातीची आर्जवे, मनोहर चव्हाचे म तांडो बोलरोछुं,उदल नायकाचे भिया आब लढा..रे आणि अमोल नायकाचे गोरपिठ हे प्रचंड गाजलेले गोरबंजारा समाजातील कवितासंग्रह असून यामध्ये तांडा आणि गोरबंजारा समाजाच्या व्यथा आणि वेदना मांडलेल्या आहेत. त्या वेदनेच्या पलीकडे जावुन आणि दु:खाच्या तळाशी जावुन कवी संदीप राठोड यांनी ‘भूक छळते तेव्हा…’ या कवितासंग्रहातून तमाम तांड्यांच्या प्रंचड वेदना आणि दु:खाबरोबर आशावाद मांडलेला आहे. कवी संदीप राठोड आपल्या ‘भूक छळते तेव्हा…’ या पहिल्याच कवितेत म्हणतो…
- रसातळात गाडले गेलेले
- पिढ्यां-पिढ्यांचे शापित देह
- करतात केविलवाणी धडपड
- जिवंत राहण्यासाठी…
गोरगणाची गौरवशाली आणि ऐतिहासिक परंपरा होती. सिंधू संस्कृतीचे हे खरे मालक. आपल्या वैभवशाली जीवनशैलीने प्रसिद्ध होते. परंतु भारतावर अनेक आक्रमणे झाली. मुस्लिम आणि इंग्रजांच्या आक्रमणाने पिढ्यानपिढ्या चालणारा लदेनीचा व्यवसाय हा बंद पडला. आणि यांचा रोजगारच बुडाला. आणि कायम तांड्याच्या वाट्याला भटकंती आली. कालांतराने तांडा स्थिरावला पंरतु प्रंचड वेदना आणि दु:ख सोबत घेऊन. आज तांडा जगण्यासाठी केविलवाणी धडपड करतो आहे. हे चित्र कवी संदीप राठोड यांच्या हळव्या मनाने हेरून आपल्या कवितेतून तमाम तांड्याच्या व्यथा, वेदना उजागर करत-करत पुढे कवी जातो.
- तुडवीत राहतात वाटा
- जीव चिमटीत पकडून…
- उदरनिर्वाहाचं साधनच
- हिसकावून घेतल्यानंतर
- भाकरीच्या शोधात निरंतर
- वणवण भटकावे लागते जेव्हा…
- अतृप्त राहिलेल्या आत्म्यांना
- जगावं की मरावं
- हेच कळत नाही
- भूक छळते तेव्हा…
खरंच माणसाला किती भूक छळते याचं हृदयद्रावक चित्रण त्यांनी वरील ओळीत केलेले आहे. उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन बंजारा समाजाच्या वाट्याला नसताना तो भाकरीच्या शोधात निरंतर वणवण भटकत राहतो. ही हृदय पिळवटून टाकणारी बाब त्यांनी आपल्या कवितेतून उजागर केलेली आहे.
कवी संदीप राठोड हा एका छोट्याशा तांड्यात राहणारा. आई-वडील मोल मजुरी करणारे. पोटाची खळगी भरण्यासाठी दोन वेळंचे जेवणनही त्यांच्या नशिबात आलं नाही. अशाही भयाण परिस्थितीमध्ये संदीपचा बाप आपली मुलं शिकली पाहिजे. मोठी झाली पाहिजे अशी आस लावून तो वणवण या गावाहून त्या गावात भटकत राहतो. माझे आयुष्य तर बरबाद झालेले आहे. पण माझ्या मुलांचे आयुष्य सुखात जावे यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू राहते. अशी भटकंती करत असताना ते निघोज गावामध्ये स्थिरावतात. आणि बाबासाहेब वराळ गुरुजींच्या माध्यमातून ते शाळेच्या दारापर्यंत पोहोचतात. आणि गुरुजींच्या आधाराने त्यांच्या शाळेचा श्री गणेशा सुरू होतो. पण शिक्षण शिकताना संदीप राठोडला प्रचंड अडचणी येतात. त्यासाठी त्याचा मोठा भाऊ दिलीप राठोड आपले अर्धवट शिक्षण सोडून तो संदीपच्या शिक्षणाकरिता मोलमजुरी करायला लागतो. आणि संदीपच्या शिक्षणाला हातभार लावुन त्याला नोकरीवर लावण्यासाठी तो धडपडत असतो. हे मनोगतातील भावस्पर्शी शब्द मनाला चटका लावुन जातात. शालेय जीवनापासून कवी संदीप राठोडला कविता करण्याचा छंद लागला. आणि तो कविता करता करता केव्हा कवी बनला हे त्याचेच त्याला कळले नाही. अनेक पुरस्कार मिळाले. आज कवी संदीप राठोड एक नामवंत कवी म्हणून गोरबंजारा साहित्याचाच नव्हे तर मराठी साहित्यामध्ये उदयाला आलेला प्रतिभावंत कवी आहे. कवी संदीप राठोड मुळे गोर साहित्यामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे त्यांचे मी याडी फाउंडेशन तर्फे मनापासून अभिनंदन करतो. त्याला धन्यवाद देतो.
कवी संदीप राठोड यांचे “भूक छळते तेव्हा…” हा कवितासंग्रह १० ऑक्टोबर २०२२ रोजी प्रकाशीत झालेला असून या कवितासंग्रहामध्ये एकूण ७२ कविता आहे. प्रत्येक कविता एकापेक्षा एक सरस असून निरनिराळ्या कविता वाचताना डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. चला ‘साक्षीदार’ या कवितेतील ओळी पाहुया…
- घर म्हणजे फक्त
- नसतात भिंती चार
- अनेक घडामोडींचे
- ते असते साक्षीदार…
घर तुटकं मुटकं असलं, झोपडी जरी असली तरी ते घर आहे. घर कसेही असो ते घर असतं आणि अनेक घडामोडींचे ते साक्षीदार असतं याची जाणीव कवीने करून देलेली आहे. कवी संदीप राठोड म्हणजे ऊसतोड कामगाराचा मुलगा. बारा महिन्यातील सहा महिने ऊसतोड करायची आणि उरलेल्या दिवसात बरड शेती करून आपल्या संसाराचा गाडा हाकणारा संदीपचा बाप लहू तुकाराम राठोड हा एखाद्या नायकाला लाजवेल असा हा कवितेतील नायक वाटतो.
- निघतो तांडा साखरनगरा
- सोबत संसार घेऊन
- ओसाड करून गावाला
- जातो भयान शांतता ठेवून…
या ओळी वाचताना खरंच तांड्यातिल ऊस तोडण्यासाठी जातानाचे दृष्य उभे राहते. अंगावर काटे येतात. ही परिस्थिती हरएक तांड्याच्या वाट्याला आलेली आहे. आणि आपण ती अनुभवलेली आहे. आज महाराष्ट्रातील अनेक तांड्यांमधून ऊसतोडीला लोक जात असतात. आपला संसार घेऊन ही मंडळी तांड्यात भयान शांतता ठेवून ते निघून गेल्याचे भयान वास्तव्यदर्शी चित्र कवीने या कवितेमध्ये मांडलेले आहे. कवी संदीप राठोड यांनी तांड्यातल्या व्यथा,वेदनेचे आकलन फार सूक्ष्म रीतीने केलेले असून कवीने जे भोगले तेच त्यांनी आपल्या शब्दात व्यक्त करण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक कविता वाचताना कवीच्या हळव्या मनाची कल्पना येते. कवी आपल्या ‘कष्टाचा हंगाम’ या कवितेत म्हणतो….
- देहाने या सांग देवा
- किती करावे काम?
- चार दिसांची बाळंतीण
- फडात गळते घाम…
या ओळी वाचताना अंगावर काटे येऊन त्या बाळबाळंतिनिचे ऊसाच्या पाचगटात ठेवलेले बाळ दिसल्याचा भास होतो. या ओळीतून कवी देवालाच आव्हान करतो की, किती काम करून घेशील? चार दिवसाची बाळंतीणसुद्धा फडात घाम गाळते आहे. अशी कशी देवा तुझी ही विषमतावादी व्यवस्था. कारण या समाज व्यवस्थेने तिचे जगणे मुश्किल केले असुन पोटाची खळगी भरण्यासाठी तिला आपलं बाळ ऊसाच्या पाचगटामध्ये ठेवून काम केल्याशिवाय पर्याय नाही. हे भयान वास्तव कवीने आपल्या कवितेत मांडून गोरबंजारा समाजातिल तमाम नेत्यांना आव्हान केल्याचे दिसते. कवी एवढ्यावरच थांबत नाही तर ऊसतोड काम करणाऱ्या कामगारांच्या देहाचा कसा सापळा झालेला आहे. हे तो आपल्या ‘कोयता’ या कवितेत मांडतो….
- कष्टत राहतो फडात
- घामाने धनी न्हालेला
- मास नसते छटाकभर
- देहाचा सापळा झालेला…
यावरून कवीची आकलन शक्ती फारच मोठी दिसते. ऊस कामगाराच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवल्यामुळे या दर्जेदार कविता जन्माला आलेल्या आहेत. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता ‘वेदनेची होळी’ या कवितेतील ओळी पाहुया…
- बाप तोडायचा ऊस
- माय बांधायची मोळी
- काळजात खोल वेदनेची
- रोज पेटायची होळी…
रोज आईबाप ऊस तोडायचे, मोळी बांधायचे तरी एवढे कष्ट करूनही पोट भरत नाही. अशा विवंचना तांड्याच्या वाट्याला आलेल्या आहेत. ह्या व्यथा आणि वेदना केवळ कवीच्या आई-वडिलांच्या नाहीत. तर तमाम तांड्यातील लोकांच्या या वेदना आहेत. महानायक वसंतराव नाईकसाहेब यांनी घोषणा केली होती की, माझा शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे! आणि ते खरंही आहे. परंतु येथील समाज व्यवस्थेने नाईक साहेबांचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. ऊसतोड कामगारांची दखल कोणीच घेत नाही. आज हा उपेक्षित वर्ग असून तो बीमार असो की अर्धमेला. तरी त्याला ऊस तोडावेच लागते. हे कवी संदीप राठोडने हेरून त्यांनी ‘कष्टकरी’ या कवितेत फार तळमळीने त्यांचे दु:ख मांडलेले आहे…
- श्वास गुदमरतो कष्टाने
- काळजाला लागते धाप
- गडी तोडत राहतो ऊस
- जरी अंगात भरला ताप…
अंगात ताप असो की, काळजाला धाप लागो . त्यांच्या वाट्याला ऊसतोडणी आलेली आहे. एवढे कष्ट करूनही ऊसतोड कामगारांची भूक मात्र भागत नाही. कायम त्यांना भूक छळते आहे. ऊसतोड काम करणाऱ्या मजुरांचे कष्ट मोजण्याचे माप अजून कोणी काढलेले नाही. म्हणून कवी आपल्या ‘दास’ कवितेत म्हणतो…
- कष्ट मोजण्याचे कोणी
- अजून काढलेले नाही माप
- रक्त ओकूस्तोर राबायचा
- मातीत माझा बाप…
खरंच कविच्या बापाने केलेल्या प्रचंड कष्टाचे मौल त्यांनी आपल्या कवितेत केल्याचे दिसून येते. हे पिडादायक कष्ट केवळ कवीच्या बापालाच आलेले नाही. तर गोरगणातील तमाम तांड्यातील लोकांच्या वाट्याला आलेले दुःख आहे. कवी आपल्या कवितेतून ऊस तोडणी कामगार, मजूर यांच्या जगण्याचे विविध पैलू उलगडत जातो. प्रचंड कष्ट आणि ढोर मेहनत करूनही पोटभर अन्न सुद्धा मिळत नाही. याचा जाब कवी आपल्या कवितेतून विचारत आहे. आज गोरबंजारा समाजात अनेक पूजाअर्चा करणारे लोक दिसतील हरामाचा पैसा आला म्हणजे मंदिराकडे माणसाचे पाय वळतात. परंतु कवी संदीप राठोडचा बाप हा दगडाला देव मानणारा नव्हता तर कष्टालाच देव माणायचा.. म्हणून कवी ‘इमानी बाप’ या कवितेत लिहतो…
- लुटून कोणाला बापानं
- नाही जमवली ठेव
- पूजा केली मनोभावे
- कष्टाला मानून देव….
कष्टाला देव मानणारा बाप आज सापडत नाही. या फार महत्त्वाच्या ओळी आहेत. अठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीलाच पुजलेलं असतं. दरवर्षी दुष्काळाच्या झळा तांड्याला बसतात. तांडा सैरभैर होतो. म्हणून कवी आपल्या ‘दुष्काळाच्या झळा’ या कवितेत म्हणतो…
- सोसवत नाहीत आता
- दुष्काळाच्या झळा
- या वांझोट्या ढगांना
- मोकळ्याच येती कळा…
शेतकरी हा जगाचा पालनपोषणकर्ता असून जगाला पोसणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र स्वतःची खळगीसुद्धा बरोबर भरत नाही. हे वास्तव सत्य आहे. म्हणून कवी आपल्या ‘रिकामी झोळी’ या कवितेत फार व्याकुळतेने आपल्या व्यथा मांडताना तो लिहितो…
- मिळे पोटभर जगाला
- बाप माझा राबतो तव्हा
- पण रिकामी त्याची झोळी
- सांग भरणार कधी देवा…?
जगाचा पालनपोषण करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांची अशीच गत आहे. त्यामुळे हे देवा आता तुच सांग मी जगाचा पोट भरतो. परंतु माझीच रिकामी झोळी का राहते ? याचे उत्तर मात्र आज कोणाकडेच नाही. हे वास्तव सत्य आहे. ‘जिवंत आहे’ या कवितेतील ओळी पाहूया…
- भोवळ येउस्तोर भूक
- पोटात करते तांडव
- जाळत राहते मनसोक्त
- उभ्या देहाचा मांडव…
भूक माणसाला एवढी छळते की, भोवळ येईपर्यंत पोटात ती तांडव करत राहते .आणि त्यामुळेच माणसाचा देह हा मनसोक्त जळणारा मांडवच आहे. यावरून कवीच्या सूक्ष्म निरिक्षणाची कल्पना येते .तांड्याचे जीवनमान आणि ऊसतोड कामगारांच्या भयान वास्तवदर्शन चित्रण त्यांनी आपल्या कवितेतून मांडण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. कवी संदीप हा तांड्यात जन्मला, वाढला, आणि तांड्यातच शिकला,मोठा झाला. त्यामुळे आजही त्याची तांड्याशी नाळ जोडलेली असल्याचे दिसून येते. कवी संदीप राठोड यांच्या कवितेवरून असे वाटते की, कवी हा तांड्यांच्या व्यथा आणि वेदना या विषमतावादी व्यवस्थेसमोर मांडणारा तो नायक असल्याचे वाटते.
खरंच कवीने मांडलेल्या व्यथा आणि वेदना या तांड्याच्या वाट्याला आलेल्या असल्या तरी तांडा आज त्यामधुन तावून सुलाखून बाहेर पडतो आहे. तांड्याने, दारिद्र्य, संकट याला कधीही भिक घातली नाही. तांड्याला फक्त भूकच छळत..नाही तर तांड्याला हंडाभर पाणी सुद्धा मिळत नाही. तांड्याच्या व्यथा,वेदना या अनेक आहेत. परंतु तांडा त्याला भीक घालत नाही. आणि घाबरतही नाही. तांड्यावर कितीही संकटे आली. तरी तांडा माणुसकीनेच राहतो. तो कधीही माणुसकी सोडत नाही. म्हणून ‘माणुसकी तू जप’ या कवितेत कवी लिहितो…
- मजबूत आहे मूळ तिचे
- तू बहरत ठेवण्या खप
- वारसाहक्काने देतो आहे
- ती माणुसकी तुझा तू जप…
निर्मळ नाते, पंढरपूर, भगवंताचे देणे, साज ,माय माती ,उभी वादळात माय, या कविता वाचनीय असून विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. तांड्याच्या वाट्याला हजार संकटे आली.अठराविश्व दारिद्र्य आले. परंतु तांडा कधी हार मानत नाही. आणि भिकही मागत नाही. तांड्याचा हा गौरवशाली इतिहास असून तांडा संघर्ष करायला शिकवतो. हा संघर्ष कवीच्या नजरेतून कसा सुटू शकतो. म्हणून कवी संदीप राठोड ‘संघर्ष करायला शिक’ या कवितेत या दोन ओळी अभिमानाने लिहितो….
- संकटाशी सदैव तू
- संघर्ष करायला शीक
- लाचार होऊन लेकरा
- कधी मागू नको भीक …
एकंदरीत ‘भूक छळते तेव्हा’ हा कवी संदीप राठोडचा कवितासंग्रह अत्यंत दर्जेदार असून कवी संदीप राठोडला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे, काव्यपुष्प साहित्य भूषण पुरस्कार मुंबई, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य पुरस्कार पुणे, अष्टपैलू काव्यलेखन गौरव पुरस्कार मुंबई ,नाठाळांच्या माथी हाणू काठी काव्य पुरस्कार विद्रोही साहित्य संमेलन पुणे, आणि बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्कार मंचर असे अनेक पुरस्कार मिळालेले असून भूक छळते तेव्हा हा कवितासंग्रह प्रत्येक तरुणांनी वाचायलाच पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे. या कवितासंग्रहातील कविता तमाम तरुणांना प्रेरणा देणाऱ्या असून सदरचा कवितासंग्रह एखाद्या विद्यापीठाला अभ्यासले जाण्याची अत्यंत गरज आहे. महानायक वसंतराव नाईक साहेबांच्या आरक्षण नीतीने सोई सवलती गोरबंजारा समाजाला मिळाल्या म्हणून गोरबंजारा समाजातला माणूस आज सुटा बुटात गाडी माडी आणि साडीच्या वर्तुळाभोवती फिरत असून त्यांनी तांड्याच्या व्यथा वेदना याकडे लक्ष देणे सोडून दिलेले आहे. जणूकाही त्याला आता गोरबंजारा समाजाशी काहीही देणे घेणे नाही. असेच सगळीकडे वातावरण दिसून येत असताना मात्र कवी संदीप राठोड तमाम तांड्याच्या दु:खाच्या मुळाशी जावुन व्यथावेदना आपल्या कवितेतून उजागर करून समाजाकडे कानाडोळा करणाऱ्या ढोंगी नेत्यांचा मुखवटा तो टराटरा फाडतो आहे. हेच कवीचे फार मोठे यश म्हणावे लागेल. म्हणून कवी संदीप राठोडला मी मनापासून धन्यवाद देतो ! एक दिवस भूक छळते तेव्हा… हा कवितासंग्रह निश्चितच विद्यापीठांमध्ये अभ्यासला जाईल अशी मला आशा आहे. या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे.
- पुस्तक- कवितासंग्रह
- शीर्षक- भूक छळते तेव्हा…
- कवी- संदीप राठोड
- प्रकाशन- पारनेर साहित्य साधना मंच
- मुखपृष्ठ- शीतलकुमार गोरे
- पृष्ठ संख्या- ११२
- मूल्य- १५० रु.
- कवी संदीप राठोड यांच्या लेखन साहित्याला मनभर शुभेच्छा !
- समीक्षक
- -याडीकार पंजाबराव चव्हाण
- पुसद
- 94 21 77 43 72
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–