अमरावती : पांदणरस्त्याचे मजबुतीकरण होऊन शेतकरी बांधवांना शेतापयर्ंत पोहोचणे व मालाची वाहतूक करणे सोयीचे जावे यासाठी जिल्ह्यात अभिसरणातून 1 हजार ६४0 किलोमीटर लांबीचे पांदणरस्ते आकारास येत आहेत. अभिसरणातून अधिकाधिक कामे घेऊन पांदणरस्ते योजनेचे जिल्ह्यात विशेष मॉडेल राबविण्याबाबत निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार विविध विधानसभा सदस्य व लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहयोगातून स्थानिक विकास निधी, मनरेगा, जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचा वापर करून अभिसरणातून पांदणरस्त्यांच्या कामांना गती देण्यात आली आहे.जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडून त्यांच्या तालुक्यातील अपेक्षित कामांचे परिपूर्ण नियोजन तयार करून घेतले. महाराजस्व अभियान राबवून ११७६ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले. त्यात १२९३ किमी लांबीच्या अतिक्रमणमुक्त पांदणीत कच्चा रस्ता तयार करण्यात येणार आहे. १६३ किमी कच्च्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे, तसेच त्याव्यतिरिक्त सुमारे ९४ किमी रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे तयार करण्यात येणार आहे. पांदणरस्त्यांच्या कामांना मान्यवर लोकप्रतिनिधींच्या सहयोगातून स्थानिक विकास निधी, मनरेगा, डीपीडीसी आदी विविध बाबींतून निधी उपलब्ध करून देण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेतून २१ कोटी १७ लक्ष व आमदार निधी, ठक्कर बाप्पा योजनेतून ८ कोटी ४८ लक्ष निधी देण्यात आला आहे. उर्वरित निधी मनरेगातून उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी दिली.
रस्ता मजबुतीकरणाबरोबरच अतिक्रमणही दूर होते. पालकमंत्री पांदणरस्ते योजनेत कच्चा रस्ता मजबुतीकरण करणे, अतिक्रमण काढून कच्चा रस्ता तयार करणे, तसेच अतिक्रमण काढून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे तयार करण्यात येतो, अशी माहिती लंके यांनी दिली.
जिल्हाधिकार्यांनी केली पाहणी
दरम्यान, जिल्हाधिकारी नवाल यांनी आज वेगवेगळ्या ठिकाणी पांदणरस्त्यांची पाहणी करून कामांना वेग देण्याचे निर्देश दिले. उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यावेळी उपस्थित होते.