मुंबई : वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारने मुभा दिली आहे.
शेतकर्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला असल्याचे सरकारने म्हटले आहे. हा निर्णय शेतकर्यांच्या हिताचा असून शेतकर्यांच्या फळ उत्पादनावरच वायनरी चालत असल्याने निर्णय अतिशय महत्त्वाचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात राज्यातील किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठक संपल्यानंतर नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात बर्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन धोरण ठरवले आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवागनी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्वेअर फुटापयर्ंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असे नवाब मलिक म्हणाले.
राज्याच्या वाईन धोरणावर टीका करणार्या भाजपाचाही नवाब मलिक यांनी यावेळी समाचार घेतला. गोव्यात आणि हिमाचलमध्येही भाजपाने हेच धोरण आणले आहे. त्यांची सत्ता असलेल्या अनेक राज्यात भाजपाने वाईन विक्रीचे धोरण स्वीकारले आहे. इथे मात्र ते विरोध करत आहेत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.