Sunday, October 26

शेतकऱ्यांची शेती गेली वाहून, सरकार गेलं झोपून ! बँका मात्र उठल्या आहे तगादा लावून !

"अतिवृष्टीत उद्ध्वस्त मराठवाड्यातील शेतकरी – घरदार व शेती वाहून गेलेले दृश्य"

औरंगाबाद : मराठवाड्याच्या मातीने पुन्हा एकदा रक्त गाळलं आहे… पण सरकारकडे अजूनही झोपेचे डोळे आहेत. घरदार, शेती, संसार सगळं वाहून गेलं; पण ‘मदत’ मात्र अद्याप कागदावरच. अतिवृष्टीने हजारो शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला, पण बँकांचे नोटीस पाठवणारे फोन अजूनही थांबलेले नाहीत.

“घरदार गेलं, शिवार गेलं… पण बँका आमच्या जिवाला लागल्या!” हा मराठवाड्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा आक्रोश आहे. शिवार हेल्पलाईनवर आलेले ५४४६ फोन सांगतात की, ही केवळ आपत्ती नाही, तर ‘मानसिक दुष्काळ’ आहे. सरकारचे आश्वासन ओघळलेल्या पावसासारखे आणि बँकांचा तगादा वीज कोसळावी तसे सुरू आहे.

अजूनही १७०० शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. हातात काहीच नाही, अंगावर कपडे तेवढे शिल्लक. “साहेब, थोडा आधार द्या, नाहीतर आम्ही नकोच जगायला…” या विनवणीतही आता थकवा दिसतोय.

शेतकरी आजही वाट बघतोय मदतीच्या ‘हवामान बदलाचा’. पण सरकारच्या आभाळातून पडतात फक्त ‘घोषणांचे पावसाचे थेंब’…

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.