केदारे प्रज्वल दादू, अचूक नेमबाज.!

काल म्हणजे रविवारी सकाळीच सात वाजता याच्या वस्तीवर काही कामानिमित्त जायचा योग आला . जवळजवळ जंगलातच घर आहे त्याचं . रस्ता इतका अडचणीचा की तिथून जाताना एखादं जंगली जनावर अंगावर झेप घेतंय की काय अशी सारखी भीती वाटत होती . घराला कंपाऊंड सोडा भिंती आणि पक्का दरवाजा सुद्धा नाही. जंगली श्वापदं कधीही येऊन त्रास देतात. आणि मग त्याच्यापासून वाचण्याचं हे एकमेव अस्त्र. वाघाचं कातडं पातळ असल्यामुळं जर खरंच या गलोलीतून सुटलेला एखादा दगड त्याला जिव्हारी बसला तर तो परत कधीच त्या भागात फिरकत नाही . हे यांचं खरंखुरं ‘प्रयोगातून विज्ञान’ .
प्रत्येकाच्या झोपडीपुढं चार–दोन कोंबड्या , शेळ्या , मेंढ्या सतत असल्यामुळं लांडगा , रानमांजर , ऊद , मुंगूस हे तर यांचे नेहमीचेच पाहुणे त्यामुळं त्यांच्या पाहुणचारासाठी हे स्वस्त, मस्त आणि प्रभावी असं हत्यार जे एक मूलभूत गरज म्हणून लहान–मोठ्या सगळ्यांनाच शिकून घ्यावं लागतं . आमच्या गप्पा चालू होत्या त्यावेळी माझं लक्ष्य या चुणचुणीत मुलानं वेधून घेतलं . कदाचित अजून नाष्टाही केला नसेल त्यानं आणि हातात ‘गलोल’ घेऊन एव्हढ्या सकाळी त्याची नेमबाजी चालली होती . त्याला जवळ बोलावून उगाच परीक्षा घेण्याचा मलाही मोह झाला . ( शुद्ध मराठीत किडा वळवळला असंही म्हणता येईल.) मग काय मीही अगदीच द्रोणाचार्यांच्या अविर्भावात साधारण पंचवीस–तीस फुटांवर पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या स्टीलच्या हंड्याकडे बोट दाखवून त्याला म्हटलं , “हं , उडव बरं तो हंडा” तर भलत्याच आत्मविश्वासानं तो म्हणाला ,“ नको रं बाबा , कोच पडंल त्याला…, आई मारील .” मी हसून त्याच्या शेजारच्याच प्लास्टिकच्या ड्रमकडं बोट केलं तर, “आरं भॉक पडंल त्याला. ” तो इतक्या सहज बोलत होता की नेमबाजी त्याच्यासाठी खूपच क्षुल्लक आहे . पण मला मात्र त्याला काहीच येत नसल्यानं तो खोटं बोलून मला टाळण्याचा प्रयत्न करतोय असं वाटत होतं .
शेवटी जवळची बिसलरीची बाटली त्याच्यापासून ३५–४० फुटांवर ठेवून म्हटलं , “हा आता उडव हिला , फुटली तर फुटुदे माझीच आहे .” आता मात्र त्याच्याजवळ पर्यायच नव्हता. तो पळून जाईल असा विचार मी करतच होतो पण दुसऱ्याच क्षणी काही सेकंदात त्यानं नेम धरून ती बाटली उडवली सुद्धा. एव्हढंच नाही तर ऐन श्रावणात जवळच एका कोंबड्यांच्या खुराड्याजवळ खुडबुड करणाऱ्या एका मुंगसालाही त्यानं शिताफीनं पळवून लावलं. तो काही शिकाऊ नाही तर अट्टल ‘खिलाडी’ आहे हे लक्षात आलं . ऑलिम्पिक मध्ये स्थिर वस्तूवर निशाणा साधला जातो पण इथं मात्र हा अर्जुनासारखा तिथं उपलब्ध असणाऱ्या चालत्या–फिरत्या प्राण्यांवर ( कुत्रा , मुंगूस ,उडणारे पक्षी , खारुताई…) सहजच निशाणा साधत होता . एकंदरीत त्याचं ते कौशल्य पाहून का कोण जाणे पण मला उगाचच वाटलं की जर याला खरंच योग्य प्रशिक्षण आणि संधी मिळालीच तर भविष्यात तो भारताला एखादं तरी नेमबाजीतलं ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवून देईल . पण त्यासाठी आत्तापासूनच त्याला ‘A ’ for APPLE ऐवजी ‘A’ for ARCHERY आणि ‘S’ for SHOOTING प्रात्यक्षिकासह शिकवण्याची गरज आहे . कदाचित असंही होईल ‘आर्चरी’ आणि ‘रायफल शूटिंग’ हा प्रकार त्याला जेव्हा माहीत होईल तोपर्यंत त्याचं वयसुद्धा निघून गेलेलं असेल . आणि प्रॅक्टिससाठी लाखो रुपयांचं ‘धनुष्य’ अथवा ‘गन’ त्याला इथं या शेरीकोलदऱ्याच्या डोंगरात कोण आणून देईल आणि कोणते आधुनिक द्रोणाचार्य या एकलव्याला इथं शिकवायला येतील .
मोलमजुरी करून उपजिवीका करणाऱ्या आणि कमालीच्या ईमानदार असणाऱ्या अशा अनेक जमातीमधले प्रज्वलसारखे कितीतरी हरविंदरसिंग अथवा अभिनव बिंद्रा फक्त योग्य मार्गदर्शन आणि संधी न मिळाल्यानं जगासमोर येत नाहीत. कदाचित आपली व्यवस्था त्याला कारणीभूत असेलही. ती बदलणं तर आता शक्यच नाही . पण निव्वळ व्यवस्थेलाच दोष देणंही योग्य नाही . ‘मुलं ही देवाघरची फुलं’ असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला प्रसन्न करणं …. हे आपलं दरवर्षीच्या चौदा नोव्हेंबरचं टाळ्यांचं वाक्य प्रत्यक्ष अंमलात आणण्यापेक्षा आपण मात्र ज्याचा काडीचाही उपयोग होत नाही अशाच गोष्टी करत बसतो. तासन्–तास मंदिरांबाहेर दर्शनासाठी ताटकळत उभं राहतो , आधीच गडगंज श्रीमंत असणाऱ्या देवस्थानांच्या दानपेटीत हजारो–लाखो रुपये , सोनं–चांदी निनावी टाकतो . एखाद्या अतृप्त इच्छापूर्तीसाठी न खात्या देवाला मुक्या प्राण्याचा बळी देऊन जत्रेच्या नावाखाली धुडगूसही घालतो ….. पण अशा एखाद्या गुणी , गरजू मुलाचं आर्थिक पालकत्व मात्र घेऊ शकत नाही .
.... असो , तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न . लोकशाहीनं प्रत्येकाला तो अधिकारही दिलाय . शेवटी एकच माफक अपेक्षा की मोठ्या माणसांचं जाऊद्या हो पण निदान अशा या कोवळ्या , निरागस आणि गुणी मुलांसाठी तरी शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आणि कधीकाळी सोन्याचा धूर निघत असलेल्या आपल्या या सुजलाम– सुफलाम देशात , ज्यांच्याकडं आशेनं पहावं निदान असा एखादा तरी गॉडफादर असावा .......
- सतीश भिमाजी शेटे .
मु.पो. वडझिरे , ता. पारनेर , जि. अहिल्यानगर.
संपर्क ७५ ८८० ९४० १९आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...! -बंडूकुमार धवणे संपादक गौरव प्रकाशन -----------------------------
· नम्र निवेदन "निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे..."लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत. या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते. -बंडूकुमार धवणे संपादक गौरव प्रकाशन
