गौरव प्रकाशन अमरावती प्रतिनिधी :
अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि प्रा. सतेश्वर मोरे स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन शनिवार, १८ जुलै व रविवार, १९ जुलै २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन, भीम टेकडी परिसर, अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे आयोजन प्रा. बी. टी. देशमुख स्मृती परिसरातील डॉ. आशाताई थोरात सभागृहात, दिनबंधू शेगावकर मंचावर करण्यात आले असून, दोन दिवस विविध साहित्यिक, सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.
संमेलनाचा उद्घाटन समारंभ १८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असून, बुद्धवंदना व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. प्रास्ताविक डॉ. नंदकिशोर दामोदरे करतील, तर स्वागतपर भाषण इंजि. दिनेश खोंडे आणि महामंडळाची भूमिका प्रशांत वंजारे मांडतील. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बी. आर. वाघमारे, डॉ. मा. प. थोरात उपस्थित राहणार असून, उद्घाटनपर भाषण प्रा. आनंद देवडेकर करणार आहेत. संमेलनाध्यक्ष युवराज गंगाराम अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील. यावेळी प्रा. सतेश्वर मोरे काव्यप्रतिभा सन्मानही प्रदान करण्यात येणार आहे.
सायंकाळी ७ वाजता आंबेडकरी गझल प्रज्ञा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सूर्यकांत मुनघाटे अध्यक्षस्थानी राहतील. प्रा. रवीप्रकाश चापके यांच्या संचालनाखाली राज्यातील अनेक नामवंत गझलकार सहभागी होणार आहेत.
१९ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता विजय तेलमोरे प्रस्तुत ‘गाणे निळ्या नभाचे’ या कार्यक्रमाने दुसऱ्या दिवसाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता कथाकथन, ११.३० वाजता ‘लोकशाही, प्रसारमाध्यमे आणि आंबेडकरी साहित्य’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या चर्चासत्रात डॉ. वामन गवई अध्यक्षस्थानी राहतील, तर डॉ. अनिल काळबांडे, प्रसेंजित गायकवाड, मांगीलाल राठोड यांच्यासह विविध मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.
दुपारी १.३० वाजता ‘निर्धार’ हा एकपात्री नाट्यप्रयोग प्रणेती डंभारे सादर करण्यात येणार असून, त्यानंतर दुपारी २ वाजता ‘दिनबंधू शेगावकर यांचे आंबेडकरी साहित्य चळवळीतील योगदान’ या विषयावर परिसंवाद होईल. निवृत्त आयएएस अधिकारी विश्वनाथ शेगावकर अध्यक्षस्थानी राहतील, तर डॉ. अशोक इंगळे प्रमुख वक्ते असतील.
दुपारी ३ वाजता आंबेडकर कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून, अनिल कांबळे (वाशिम) अध्यक्षस्थानी राहतील. राज्यभरातील अनेक कवी या काव्यसंमेलनात सहभाग घेणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता ‘आंबेडकरी कला, साहित्य, संस्कृती आणि वर्तमान’ या विषयावर विशेष परिचर्चा होणार आहे. डॉ. अनमोल शेंडे अध्यक्षस्थानी राहतील. आंबेडकरी लेखिकांचे अनुभव व आव्हाने, नवे शैक्षणिक धोरण, समकालीन आंबेडकरी कविता तसेच भारत राष्ट्रावरील आंबेडकरी दृष्टिकोन या विषयांवर यामध्ये सरिता सातगडे, राजेश जुनगरे, डॉ. भास्कर पाटील, धम्मा कांबळे हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
संमेलनाचा समारोप सायंकाळी ६ वाजता युवराज गंगाराम यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, छाया खोब्रागडे, पुष्पाताई थोरात, मधु बावलकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या संमेलनासाठी सुरत सहारे, गणराज भगत, चेतन गवई, सागर वासनिक, सागर लोहकरे, नितीन सवई, आकाश गडलिंग, मेघराज भगत, विशाल जोंधळे, क्षितिज गडलिंग, सारंगधर कांबळे, भूषण रामटेके, सुमेध खडसे यांच्यासह आयोजन समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत. प्रसिद्धी प्रमुख म्हणून बंडूकुमार धवणे, नयन मोंढे, सिद्धार्थ बनसोड, मच्छिंद्र भटकर आणि नकुल नाईक कार्यरत आहेत.
संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागत समितीचे अध्यक्ष रमेश कटके यांच्या नेतृत्वाखाली प्रा. डॉ. कमलाकर पायस, प्रा. डॉ. अण्णा वैद्य, प्रा. डॉ. गोपीचंद मेश्राम, के. के. देशभ्रतार, सुरेंद्र घरडे , राजेश गरुड, धर्मशील गेडाम आणि संघपाल सरदार हे कार्यरत आहेत.
संमेलनासाठी मार्गदर्शक म्हणून अशोक बुरबुरे, प्रा. डॉ. वसंत शेंडे, प्रा. डॉ. माधव सरकुंडे, डॉ. मनोहर नाईक, अरविंद निकोशे, प्रा. डॉ. अशोक इंगळे, प्रा. डॉ. अशोक कांबळे, प्रा. डॉ. रवींद्र मुंद्रे आणि प्रा. आत्माराम ढोक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या संमेलनास संबोधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी सर्कल, आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन मंच, साप्ताहिक वज्जीसंदेश परिवार, मुक्त मंथन त्रैमासिक आणि शिल्पकार फाउंडेशन, अंजनगाव या संस्थांचे सहकार्य लाभले आहे.
संमेलनाचे संयोजन व संपर्क यांची जबाबदारी संजय मोखडे सांभाळत असून, विदर्भासह राज्यभरातील साहित्यिक, लेखक, कवी, संशोधक, विद्यार्थी आणि आंबेडकरी विचारांच्या अभ्यासकांनी या दोन दिवसीय साहित्य संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलनात साहित्य, कविता, गझल, कथा, नाट्य, विचारमंथन आणि सामाजिक-सांस्कृतिक संवाद यांचा संगम अनुभवायला मिळणार असून, विदर्भासह राज्यभरातील साहित्यिक, कवी, लेखक, संशोधक आणि आंबेडकरी विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.






