Tuesday, April 28

विदर्भाचे वाढते तापमान चिंताजनक | अकोला 46.9°C उच्चांक, उष्णतेची लाट वाढली

महाराष्ट्रातील उष्ण हवामान आणि उष्माघात परिस्थिती

प्रत्येक उन्हाळ्यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या शहराचे तापमान 45 डिग्रीच्या वर नोंदवले जाते. त्यामुळे विदर्भात राहणाऱ्या लोकांची ‘मे’ महिन्यातील प्रखर उन्हात काय अवस्था होत असेल याचा विचार करूनच अनेकजन विदर्भात येण्याची हिम्मत करत नाही.विदर्भातील तीव्र उष्णता आणि तापमानातील सततची वाढ (४४°C-४६°C च्या वर) ही एक गंभीर चिंतेची बाब आहे. अकोला, वर्धा आणि नागपूरसारखी शहरे देशातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी आहेत, ज्यामुळे उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने दुपारच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पारा ४३°C ते ४६.९°C पर्यंत पोहोचला आहे, जो सामान्य तापमानापेक्षा ४-८ अंशांनी जास्त आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, जो एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत टिकण्याची शक्यता आहे. उष्माघातामुळे होणारे मृत्यू आणि आरोग्याचे धोके (जसे की निर्जलीकरण आणि उष्माघात) वाढले आहेत.

जगात सर्वाधिक तापमानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोल्यात तीव्र झळांचे चटके बसत आहेत. अकोल्याचे तापमान ४६.९ अंशांवर पोहोचले असून यावर्षीचा नवा उच्चांक गाठला आहे. आणखी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.


अकोला जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात तापमानात कमालीची वाढ होते. जिल्ह्यात दरवर्षी तापमानाचे विक्रम रचले जातात. देशातच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून अकोला पुढे आले आहे. या उन्हाळ्यात देखील अकोला जागतिक पातळीवर सर्वाधिक उष्ण शहर ठरले. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यापासून तप्त उन्हाच्या तीव्र झळा बसण्यास सुरुवात झाली. दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते निर्मनुष्य होतात. अंगाची लाहीलाही होते. शहरात उष्माघातामुळे एकाचा बळी देखील गेला. काही दिवसांपूर्वी वातावरणात थोडा बदल झाला होता. शहरात काही काळ ढगाळ वातावरण निर्माण होते. मात्र, त्याचा तापमानावर परिणाम झालेला नाही. तापमानाचा चढता आलेख कायमच आहे.यावर्षीचे सर्वाधिक तापमान जिल्ह्यात यावर्षीचे सर्वाधिक तापमान रविवारी नोंदवल्या गेले. अकोल्याच्या तापमानाचा पारा शनिवारी ४५.६ अं.से.वर पोहोचला होता. उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आज तापमानात मोठी वाढ नोंदवल्या गेली. आतापर्यंत ४५.६ अंशांवर सर्वाधिक तापमान होते. आता ते ४६.९ अंशांवर पोहोचले. वाढलेल्या तापमानामुळे दाहकता चांगलीच वाढली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे वाहनांना देखील आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तापमानाचा वाढलेला पारा लक्षात घेता नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली.


देशातील इतर शहरांच्या तुलनेत विदर्भातील या चार ते पाच शहरांमध्ये तापमान इतके का वाढते? विदर्भ हा प्रदेश कर्करेषेच्या अगदी जवळ असल्याने सूर्याच्या किरणांचा थेट मारा विदर्भावर होतो. सोबतच या भागात पठार किंवा डोंगर नाहीत, सपाट भूभाग आहे. त्यामुळे उत्तरंच्या राज्यातून विशेषतः राजस्थानकडून वाहणारे उष्ण वारे थेट विदर्भापर्यंत पोहोचतात.भौगोलिक दृष्ट्या नागपूर आणि विदर्भाचे वेगळेपण आहे. नागपूर हे शहर देशाच्या मध्यभागी वसलेले आहे. मात्र, विदर्भ हा प्रदेश कर्करेषेवरील भूभाग आहे. त्यामुळे सूर्य किरणे थेट विदर्भात पडत असल्याने त्याची दाहकता अधिक वाढते. हवामान खात्याने विदर्भासाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला असून, कोरडे हवामान आणि पश्चिमेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे.


हवामान बदल: जागतिक तापमानवाढीमुळे उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पूर्वीच्या तुलनेत आता ४२ अंशांहून अधिक तापमानाचे दिवस वाढले आहेत.
हरित पट्ट्यातील घट: वृक्षतोड, खाणकाम आणि शहरीकरणामुळे विदर्भातील वनक्षेत्र कमी झाले आहे, ज्यामुळे जमीन लवकर तापते. कोरडी माती: शेतीतील बदलांमुळे आणि कोरड्या हवामानामुळे जमिनीत ओलावा नसून, ती उष्णता जास्त शोषून घेते. वाढते औद्योगिकीकरण :गेल्या काही वर्षात विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांचे अतिशय तीव्र वेगात औद्योगिकीकरण झाले आहेत. यामध्ये सिमेंट कारखाने, कोळसा खाणी, मोठ मोठे वीज निर्मिती प्रकल्पांमुळे सुद्धा प्रदूषण आणि तापमान वाढले असल्याचे निष्कर्ष त्यांनी काढला आहे.


वृक्षतोड वाढ :विदर्भ हा वनराईने नटलेला प्रदेश आहे. मात्र, गेल्या काही काळात वेगात सुरू असलेल्या औद्योगिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे सुद्धा विदर्भातील तापमान वाढण्यामागचे एक कारण सांगितले जाते आहे. ज्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते आहे. त्या प्रमाणात वृक्षारोपण होताना दिसत नसल्याने विदर्भाची हिरवळ कमी झाली आहे. विदर्भातील हवामान हे उष्ण आणि कोरडे असल्याने उन्हाळ्यात येथे तापमान ४५°C च्या वर जाते. तापमान संतुलित ठेवण्यासाठी आणि उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी दीर्घकालीन निसर्गपूरक उपाययोजना आवश्यक आहेत.

विदर्भातील हवामान कोरडे असल्याने जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. विशेषतः स्थानिक प्रजातींची झाडे, जी सावली देतात आणि बाष्पोत्सर्जनाद्वारे हवा थंड ठेवतात. जलसंधारण आणि तलावांची पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे विदर्भातील भूजल पातळी वाढवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, चेक डॅम आणि जुन्या तलावांची पुनरुज्जीवन करणे, ज्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहील. हरित छप्पर आणि भिंती: इमारतींवर ‘ग्रीन रूफ’ (Green Roof) किंवा घराभोवती वेली लावून घराचे तापमान कमी ठेवता येते. छतावर उष्णतारोधक पांढरा रंग (Reflective paint) लावल्याने सूर्यकिरणे परावर्तित होऊन घराचे तापमान कमी राहते.विदर्भातील औष्णिक वीज केंद्रे आणि कारखान्यांमधून निघणारा धूर कमी करण्यासाठी फिल्टरचा वापर करणे.हवामान बदलाशी जुळवून घेणारी शेती करणे, पिकांच्या पद्धतीत बदल करून, फळबागांची लागवड वाढवणे, ज्यामुळे झाडांच्या सावलीत जमिनीचे तापमान कमी राहते.

प्रा सुधीर अग्रवाल

९५६१५९४३०६

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.