अमरावती : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक सुवर्णपान आहे. त्यांचे योगदान आणि कार्य भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री सुरेंद्र भुयार यांनी व्यक्त केले. ते भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो आणि राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या सयुंक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस : एक विचारधारा या विषयावर आयोजित ऑनलाइन वेबिनार मध्ये बोलत होते.
श्री भुयार म्हणाले की सुभाषबाबू यांनी १९२८ मध्ये नेहरू मैदान येथील मनपा शाळेच्या इमारतीचे उद्घाटन केले होते. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून इंग्रज सरकारला धडकी भरविणा-या नेताजींनी देशातच नाही तर परदेशातही भारतीयांच्या संघटना स्थापन करून स्वातंत्र्याचा लढा लढला. इंग्रजाना हादरविणा-या नेताजींच्या कट्टर राष्ट्र भक्ती आणि साहसी ध्येयाबद्दल भारतीयांच्या मनात ते कायम स्मरणात राहतील. यावेळी श्री भुयार यांनी नेताजींच्या द्वारे स्थापन केलेल्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची आणि धाडसी गोष्टीची माहिती उदाहरणसह दिली.
राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ राजेश बुरंगे यांनी आपल्या मनोगतात रासेयो च्या विविध उपक्रम आणि नेताजीच्या स्वातंत्र्य संग्रामातील आणि आझाद फौज स्थापनेची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये इंद्रवदनसिंह झाला यांनी नेताजीच्या देशभरात साजरा होणा-या पराक्रम दिवस आणि केंद्र सरकार कडून नेताजीच्या १२५ वी जयंती निमित्त वर्षभर होणा-या कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंबादास यादव यांनी केले. सदर कार्यक्रम प्रादेशिक लोक संपर्क ब्युरोचे MAHAROB यूटयूब वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली होती. ज्यामध्ये देशातील विविध राज्यातून लोक सहभागी झाले होते.
Related Stories
November 28, 2023
November 27, 2023
November 27, 2023