मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना लसीकरणाची तयारी सुरू असतानाच महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले असल्याचा मोठा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले आहेत, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. यासोबत केंद्राकडून करण्यात आलेल्या सुचनेनंतर लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
आपल्याला केंद्र सरकारने एकूण ९ लाख ७३ हजार लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. बफर स्टॉकसहित बोलायचे गेल्यास आपल्याला सतरा ते साडेसतरा लाख डोसची गरज आहे. आज त्यापैकी नऊ ते साडे नऊ लाख आले आहेत. याचा अर्थ ते कमी आले आहेत. केंद्र सरकाराच्या सूचनेनुसार ज्या व्यक्तीला तुम्ही डोस देत आहात, त्या व्यक्तिला पूर्ण डोस द्या. त्यामुळे अपेक्षेच्या तुलनेच ५५ टक्के डोस आलेले आहेत. त्यामुळे आठ लाख लोकांचे लसीकरण करायचे असतानाही आम्हाला ५५ टक्के म्हणजेच साधारण पाच लाखांपर्यंत लसीकरण पूर्ण करणार आहोत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
कोरोना लस महाराष्ट्रात आली असून १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होत आहे. याबद्दल राजेश टोपेंनी बोलताना सांगितले की, मला समाधान आहे. आपण आठ लाख लोकांना अपलोड केले आहे, त्याच्या तुलनेत लस कमी आली आहे. जी लस आलेली आहे ती सर्व विभागीय कार्यालयांमध्ये पोहोचेल.
१६ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचे उद््घाटन करतील. महाराष्ट्रात दोन ठिकाणी पंतप्रधानांशी संवाद साधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामधील एक कूपर रुग्णालय आणि दुसरे जालन्यातील जिल्हा रुग्णालय आहे. येथून पंतप्रधानांशी संवाद साधला जाणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. मी दोन दिवसांपूर्वी ते ५११ केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन केले होते. पण कालच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने इतक्या मोठय़ा स्तरावर लसीकरण करू नका असे सांगितले. इतर जो कार्यक्रम आणि गोष्टी सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ५११ वरुन ही संख्या ३५0 केली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर १00 अशा पद्धतीने पहिल्या दिवशी ३५ हजार जणांना लस देण्याचा आमचा मानस आहे.
Related Stories
December 2, 2023