
आजपासून RBI चा मोठा निर्णय : चेक क्लिअरन्स त्याच दिवशी, ग्राहकांना थेट फायदा
मुंबई : बँकिंग सिस्टिममध्ये आजपासून मोठा बदल झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फास्ट चेक क्लिअरन्स सिस्टिम लागू केली असून यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत चेक क्लिअर होण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असे. पण आता ही प्रतिक्षा संपली आहे.
नव्या प्रणालीत कॉन्टिन्युअस चेक क्लिअरिंग मोड सुरू करण्यात आला आहे. यानुसार सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बँकेत जमा झालेले सर्व चेक तात्काळ स्कॅन करून त्यांची इमेज आणि डेटा क्लिअरिंग हाउसकडे पाठवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संबंधित बँकेने त्या चेकची पुष्टी करणे आवश्यक असेल. मात्र वेळेत उत्तर दिले नाही तर तो चेक आपोआप क्लिअर झालेला मानला जाईल.
या बदलामुळे ग्राहकांना चेक जमा केल्यानंतर पैसे त्याच दिवशी खात्यात जमा होतील. व्यापाऱ्यांसाठी व उद्योग व्यवसायासाठी हे विशेष फायदेशीर ठरणार आहे, कारण आता व्यवहार तत्काळ होऊन कॅश फ्लो व्यवस्थित राहणार आहे. बँकिंग सिस्टिममध्ये कार्यकुशलता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढणार असल्याने ग्राहकांचा वेळ आणि ऊर्जा वाचणार आहे.
आरबीआयचा हा निर्णय बँकिंग क्षेत्रासाठी क्रांतिकारक मानला जात असून यामुळे ग्राहक सेवा दर्जा उंचावणार आहे. अनेक वर्षे ग्राहकांच्या तक्रारीचा मुद्दा असलेली चेक क्लिअरन्स प्रक्रियेतील विलंबाची समस्या आता संपुष्टात येणार आहे. आजपासून ग्राहकांना खात्रीने त्याच दिवशी पैसे मिळणार हीच या नव्या नियमाची मोठी ताकद आहे.
आजपासून बँकिंग सिस्टिममध्ये महत्वाचा नियम बदलला