मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरूड तालुक्यातील प्रसिद्ध संत्राला जगभरात मानाचे स्थान आहे. संत्र्याचे उत्पादन मोर्शी वरूड तालुक्यात मोठ्या प्रमाणात होते. परंतु गेल्या काही दिवसापासून संत्रा झाडावर फायटोपथोरा ही बुरशी चढत असल्यामुळे संत्र्याच्या उत्पादनाला ग्रहण लागले आहे. यामुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. संत्र्याला वाचविण्यासाठी हॉर्टसेप प्रकल्प अंतर्गत कृषी खात्याने संत्रा शेतीशाळा घेऊन बुरशीचे ग्रहण हटविण्याचा आटोकाट प्रयत्न मोर्शी तालुक्यात कृषी खात्यातर्फे होतांना दिसत आहे.
प्रामुख्याने संत्रा पिकावर होणारा अवाढव्य खर्च कसा कमी करता येईल, यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावे यासाठी रासायनिक व सेंद्रिय पद्धतीच्या माध्यमातून एकात्मिक संत्रा फळझाडाचा विकास कसा करणे शक्य आहे. यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे बनले आहे.
अज्ञात रोगांमुळे ५० टक्के संत्रा झाडांवर फायटोपथोरा व डींक्याने ग्रस्त असलेल्या संत्रा झाडांचे पुरुर्जिवन करण्यासाठी झाडाची छाटनी योग्य पद्धतीने करण्याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. दिवसेंदिवस जमिनीमधील जिवाणुंचे कमी होणारे अल्पप्रमाण लक्षात घेऊन सुपिकता कायम ठेवण्याच्या हेतूने संत्रा बागायतदारांना कमी खर्चात जिवाणुंची वाढ करण्यासंदर्भात जिवामृत व घनजिवामृत तयार करण्याचे प्रात्याक्षिक या संत्रा शेतीशाळेत दाखविण्यात आले.
कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मित्र कीडींची संख्या वाढविण्यासाठी कमी खर्चामध्ये दशपर्मी अर्क, निमअर्क तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शेणखताचा वापर करतांना एस-९ कल्चर तयार करण्याची पद्धती, शेतकऱ्यांना समजावून देण्यात आली. बहुतेक शेतकरी पट पद्धतीने संत्रा झाडांना पाणी देत असल्यामुळे रोगाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. हे टाळण्यासाठी पाणी देण्याची पद्धत व नियोजन यावरही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी संत्रा फळाचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याचेही मार्गदर्शन या शेतीशाळेत कृषी अधिकाऱ्यामार्फत देण्यात आले यावेळी मार्गदर्शक म्हणून डॉ श्यामसुंदर ताथोडे, तालुका कृषी अधिकारी साजना इंगळे, मंडळ कृषी अधिकारी पांडुरंग म्हस्के, कृषी पर्यवेक्षक मोहन फुले, कृषी सहाय्यक मनीष काळे, संजय अंधारे, ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, विजय विघे, श्रीकांत विघे, नरेंद्र नांदुरकर, रुपेश अंधारे, मंगेश होले, समीर वीघे, नितीन काकडे, राहुल विघे, सतीश गतफने, राजेश तळकित, युवराज अंधारे, निलेश अंधारे, सतीश धोंडे, विश्वास वानखडे, दुर्गेश कडू यांच्यासह आदी संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्शी वरूड तालुक्यात भीषण दुष्काळातून अथक परिश्रम घेऊन जगवलेल्या संत्रा बागांवर बदलत्या वातावरणाने अज्ञात रोगाचे सावट आल्याचे दिसत आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्रा गळती, संत्रा झाडांची पाने पिवळी पडून संत्रा झाडे वाळत चालली आहे. यावर सर्व उपाययोजना करून काही उपयोग होत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे संत्राबागा वाचविण्याचे आव्हान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे संशोधकांनी व कृषी विभागाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या